शेतीमाल विक्रीतील दलाली व “हत्ता’ पद्धत नष्ट करणार
पुणे, दि. 2 – शेतकऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी व दलाली पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सर्व कृषी उत्पन्नांची विक्री बाजार समित्यांच्या मार्फतच व्हावी असा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे, असे आज सहकारमंत्री शंकरराव पाटील यांनी सांगितले. पुणे कृषी बाजार समितीच्या 18व्या वर्धापन दिन समारंभात पाटील बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले, गुळ व मिरचीसारख्या फारच थोड्या वस्तूंची विक्री बाजार समित्यांनी सुरू केली आहे. सरकार “हत्ता’ पद्धत पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हत्ता पद्धतीमुळे दलाल व व्यापारी शेतकऱ्यांचा गैरफायदा घेतात, असेही पाटील यांनी मत व्यक्त केले.
न्यूयॉर्क-दिल्ली न थांबता विमानाचा प्रवास
नवी दिल्ली – अमेरिका व भारत या दोन देशांच्या दरम्यान मध्ये कोठेही न थांबता एक विमान आज प्रथमच दिल्लीला उतरले. पॅनऍम ह्या अमेरिकन हवाई वाहतूक कंपनीच्या विमानातून 106 उतारू आज दिल्लीस आले. या प्रवासास 13 तास 31 मिनिटे लागली.
चीनमध्ये मे-दिन उत्साहाने साजरा
पेकिंग – चीनमध्ये यंदाचा कामगार दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या समारंभास अनेक नेते उपस्थित होते. चौ-एन-लाय यांच्या अंत्यसंस्कार समारंभानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात चीनच्या नेत्यांनी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ. गेल्या महिन्यात गंभीर व बिकट समस्यांना चीनने तोंड दिल्यानंतर चीनच्या नेत्यांमधील ऐक्य या मे-दिनी दिसून आले.