नवी दिल्ली : जेएनयूमधील हिंसाचारावरून आक्रमक पवित्रा स्वीकारत दिल्ली कॉंग्रेसने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सोमवारी एका सभेत बोलताना दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी शहा यांना लक्ष्य केले.
मुखवटाधारी टोळीने जेएनयूचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर केलेल्या हल्ल्यानंतर दिल्लीकर भयाच्या सावटाखाली वावरत आहेत. ब्रिटीशांच्या राजवटीतही देशाने अशाप्रकारचा हिंसाचार अनुभवला नाही. विद्यार्थ्यांना मारहाण होताना दिल्ली पोलिसांनी मूक साक्षीदाराची भूमिका घेतली.
दिल्ली पोलीस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे जेएनयूमधील हिंसाचाराला शहा जबाबदार आहेत. विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी चोप्रा यांनी केली.