मुंबई : चांगले खाते मिळाले नाही म्हणून नाराज असलेले विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली. वडेट्टीवार गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह अधोरेखित झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात चांगले खाते मिळावे यासाठी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार व नितीन राऊत यांच्यात रस्सीखेच सुरु होती. अशोक चव्हाण यांनी महसूल खाते मिळावे यासाठी दिल्ली दरबारी जोर लावला होता. मात्र, यामध्ये थोरात यांनीच बाजी मारली.
त्यांना महसूल खाते तर चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले. पण सार्वजनिक बांधकाम खाते काढून घेतल्याने नितीन राऊत नाराज झाले. त्यांचीही वरिष्ठांनी नाराजी दूर करीत त्यांना उर्जा विभागाची जबाबदारी दिली. विशेष म्हणजे वडेट्टीवार यांना उर्जा विभाग हवे होते. पण ते नितीन राऊत यांना दिल्याने तेही अद्याप नाराज आहेत.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वच मंत्र्यांना दालनाचे, निवासस्थानाचे आणि खातेवाटप झाले आहे. विस्तारानंतर सर्वच मंत्र्यांनी मंत्रालयातील आपापल्या दालनाचा ताबा घेतला आहे. परंतु, वडेट्टीवार यांनी अजूनही आपल्या कार्यालयाचा ताबा घेतलेला नाही.
एवढेच नव्हे तर विस्तारानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून त्यांनी आपली नाराजी दर्शवली आहे. दरम्यान, आपण नाराज नसून जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत व्यस्त असल्याचा विजय वडेट्टीवार यांनी दावा केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन गैरहजर राहिल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.