कुरकुंभला स्फोटांची मालिका सुरूच; विकास महामंडळ तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
कुरकुंभ – कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये यापुढील काळात कोणत्याही रासायनिक कंपनीस विस्तरवाढीची किंवा नवीन कंपनीस परवानगी देताना स्थानिक ग्रामपंचायतीचे मत विचारात घ्यावे, अशी स्पष्ट भूमिका पंचक्रोषीतील ग्रामपंचायतींनी मांडलेली असताना याबाबत विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून याबाबत दिरंगाई होत असून याच कारणातून अशा कंपन्यांचा विस्तार वाढत आहे. जादा उत्पादन घेण्याच्या प्रयत्नातच कंपन्यांत स्फोट घडत असल्याचेही संबंधीत गावच्या ग्रामपंचायतींचे म्हणणे आहे.
औद्योगिक वसाहतील इटरनीस फाईन केमिकल कंपनीमध्ये रविवारी (दि.20) रात्री हायड्रोक्लोरिक लिक्विडची फायबरची टाकी फुटून स्फोट झाला. या स्फोटाचे कारण समजू शकले नसले तरी जादा उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्यांची संख्या लक्षणीय आहे, त्यातच या कंपन्यांचे विस्तारीकरणही संबंधीत यंत्रणेला अंधारात ठेवूनच केले जात आहे. कंपन्या वाढवून त्यातून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. याच कारणातून गेल्या काही वर्षांपासून येथील कंपन्यांमध्ये स्फोटांची मालिका सुरू आहे.
दौंड तलुक्यात 1989 मध्ये रासायनीक औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी स्थानिक भुमिपुत्रांनी कवडीमोल किंमतीने कंपनीसाठी जमिनी दिल्या आहेत. आज 29 वर्षानंतरही स्थानिकांचे रोजगाराचे प्रश्न सुटलेले नाहीत. रासायनिक कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात शेतजमिनी नापीक झाल्या आहेत तसेच परिसरातील गवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्या शासनाच्या पर्यावरण विषयक नियमांची पायमल्ली करीत असून या तक्रारींबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गांभीर्याने घेतली जात नाही, असा आरोपही ग्रामपंचातींकडून होत आहे. याच कारणातून या ठिकाणी कंपन्यांच्या विस्तारीकरणास ग्रामपंचायतींकडून तिव्र विरोध होत आहे.
लोकसुनावणी वेळोवेळी घ्यावी…
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्यासंदर्भात शासकीय निर्णय घेताना शासनाकडून याबाबत लोकसुनावणी घेणे गरजेचे आहे. अशी सुनावणी घेताना संबंधीत गावांना, शेतकऱ्यांना याची पूर्वकल्पना देण्यात यावी यामुळे शेतकरी सुनावणीपासुन वंचीत राहणार नाहीत. ज्यांची मक्तेदारी अशा कंपन्यांमध्ये आहे, अशा लोकांसह त्यांच्या बगलबच्यांना लोकसुनावणीचे आमंत्रण देऊ नये, अशीही मागणी संबंधीत गावच्या ग्रामपंचायतींकडून होत आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील स्फोटाची घटनानंतर संबंधीत कंपन्यांना सूचना करण्यात येत आहेत. नियमबाह्य काम केल्यास अशा कंपन्यांवर कारवाई केली जाईल. शासकीय नियमांतच उत्पादन घेण्यास संबंधीत कंपन्या बांधील आहेत.
– अखिल घोगरे, उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा विभाग, पुणे