मुंबई – बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो पराभव झाला तो दुर्दैवी आहे असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत मराठी माणूस पराभूत झाला आहे त्याचे महाराष्ट्रात भाजपकडून पेढे वाटून स्वागत केले जात आहे अशा स्वरूपाचा मराठी माणसांचा विश्वासघात यापूर्वी कधी पाहायला मिळाला नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी नोंदवली आहे. बेळगाव महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा काल धुव्वा उडाला आणि भाजपला तेथे सत्ता मिळाली यावर राऊत काल पत्रकारांशी बोलत होते.
भाजपला उद्देशून ते म्हणाले की, भाजपच्या विजयाबद्दल तुम्हाला आनंद होणे स्वाभाविक आहे पण बेळगावात मराठी माणूस पराभूत झाला आहे त्याची तुम्हाला जराही खंत कशी वाटत नाही. बेळगावच्या आत्मसन्मानासाठी आणि मराठीच्या अभिमानासाठी अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती पराभूत होण्याने महाराष्ट्राच्या अनेक भागात खदखद निर्माण झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.