लखनौ – उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्षाला पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही पुर्वी सारखे पुतळे आणि स्मारके उभारण्याचे काम करणार नाही, अशी ग्वाही बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही हे काम आमच्या आधीच्या सरकारच्या काळात घाऊक स्वरूपात केले असून आता आम्हाला अशा स्वरूपाच्या कामांची गरज नाही.
आपले सरकार यावेळी पुर्ण राज्याच्या विकासाकडेच लक्ष केंद्रीत करेल असेही त्यांनी म्हटले आहे. लखनौमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. सन 2007 मध्ये उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्षाला स्वबळावर सत्ता मिळाली होती. त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर पुतळे व स्मारके उभारली होती. त्यांनी उभारलेल्या उद्यानांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम आणि स्वत: मायावती यांचे पुतळे उभारण्यात आले होते. या स्वरूपाच्या कामावर तब्बल 1400 कोटी रूपये खर्च करण्यात आला होता.
त्यावर बरीच टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली आहे. दरम्यान त्यांनी उत्तरप्रदेशातील ब्राम्हण समाजालाही चुचकारण्याचा प्रयत्न केला. आमची सत्ता आली तर राज्यात ब्राम्हणांना पुर्ण संरक्षण असेल असेही त्यांनी म्हटले आहे. आज भाजपच्या राज्यात ब्राम्हणांची बरीच उपेक्षा झाली आहे असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की आमचा पक्ष केवळ दलित किंवा मागास लोकांच्या हितासाठी काम करणारा पक्ष नाही तर आम्ही सर्व जन हिताय आणि सर्व जन सुखाय हे तत्व डोळ्यासमोर ठेऊन काम करीत आहोत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.