मुंबई : राज्यातील राजकारणात रोज भूकंप होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता मागील विधानसभेच्यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या दीपाली सय्यद यांनी आज ठाकरे गटाला सोडचिट्ठी दिली आहे. त्यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचे पूर्ण खापर खासदार संजय राऊत यांच्या माथी फोडले आहे. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत गंभीर आरोप केले आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद यांनी,“रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे. निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. रश्मी ठाकरे खऱ्या सूत्रधार आहेत,” असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे.
“राजकारणात प्रत्येकजण आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी येत असतो. पण जर काही कारणांमुळे पक्ष फुटत असेल तर मग आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, काम कऱण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. ज्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्यासोबत गेलं पाहिजे,” असे दीपाली सय्यद यांनी सांगितले.
“खोके म्हटलं जात आहे, त्यामागील खरं राजकारण समोर आलं पाहिजे. तसंच मुंबई महापालिका नेमकी कोणाच्या ताब्यात आहे हेदेखील कळलं पाहिजे,” असेही त्यांनी यावेळी म्हटले.