मुंबई – एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेमध्ये फुट पडली. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. शिंदेंच्या बंडाला आज एक वर्षं पूर्ण झाले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्री 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केला होता. याला आज एक वर्ष पूर्ण झाल्याने ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली आहे. इतकेच काय तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 20 जून हा जागतिक गद्दार दिन जाहीर करण्याची मागणी पत्राद्वारे संयुक्त राष्ट्र संघटनेला (युनो) केली आहे.
यावर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले,’80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण बाळासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे ते वागले नाहीत. ते शंभर टक्के राजकारण करतात. त्यांनी गद्दार दिन जरूर साजरा केलाच पाहिजे कारण त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे.’
केसरकर पुढे म्हणाले,’बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायावर लोळण घेतली. त्यामुळे त्यांनी गद्दार दिन साजरा करावा. हळू हळू बंडाचे खरे स्वरुप लोकांसमोर येत आहे. हे बंड स्वाभिमानासाठी झाले होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.