मुंबई – श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या एक दिवस आधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव संघाबाहेर झाला आहे. याआधी याआधी मंगळवारी दीपक चहरही श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला होता. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दीपक चहर संघाबाहेर होता.
त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी 5 ते 6 आठवडे लागतील. त्याला आयपीएलच्या सलामीच्या सामन्यालाही मुकावे लागू शकते. तर हेअरलाइन फ्रॅक्चरमुळे तो या मालिकेतील तिन्ही सामने खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विंडीज संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती.
विराट कोहली आणि ऋषभ पंतही संघाबाहेर
केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल सारखे खेळाडू आधीच दुखापतग्रस्त असून संघातून बाहेर पडले आहेत. आता सूर्यकुमार आणि दीपक चहर देखील दुखापतग्रस्त झाल्याने संघाच्या अडचणीत वाढ होणार आहे.
विशेष म्हणजे विराट कोहली आणि ऋषभ पंत हे देखील श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही. दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयने सुट्टी दिली आहे. हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेतून मैदानात परतणार आहेत.