नवी दिल्ली – भारताच्या शास्त्रज्ञांनी आपली महत्वाकांक्षी योजना चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे रोवर उतरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेश दौऱ्यावरून शनिवारी (दि. 26) सकाळी 7.30 वाजता बंगळुरू येथील इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये चांद्रयान-3 टीमच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली.
इस्रो कमांड सेंटरमध्ये इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंतप्रधानांनी सोमनाथ यांना मिठी मारली आणि पाठीवर थाप दिली. या मोहिमेमुळे पुन्हा एकदा भारताचे नाव जगभर अभिमानाने घेतले जात आहे. अशात इस्रोकडून येणारे प्रत्येक अपडेट भारतीयांसाठी खास आहे. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
तसेच, यावेळी त्यांनी अत्यंत्य महत्वपूर्ण अशा घोषणा देखील केल्या. ज्या ठिकाणी लॅंडर चंद्रावर उतरले, त्या जागेला ‘शिवशक्ती पॉइंट’ असे म्हटले जाईल. तसेच, ज्या ठिकाणी चांद्रयान-2 च्या पायाचे ठसे आहेत, त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ असे म्हटले जाईल. अशी घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी केली.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या घोषणे नंतर ‘चंद्राला हिंदू सनातन राष्ट्र म्हणून घोषित करावं’ अशी मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केली आहे.संसदेत यासाठीचा प्रस्ताव पारीत करावा असेही ते म्हणाले. तर जिथं चांद्रयान-3 ची सॉफ्ट लँडिग झाली, त्या शिवशक्ती पॉईंटला राजधानी म्हणून विकसित करावं.
जेणेकरुन कोणी दहशतवादी किंवा जिहादी मानसिकता असलेले तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, असं स्वामी चक्रपाणी यांनी म्हटलंय. तसेच शिवशक्ती पॉइंटवर भगवान शिव, माँ पार्वती आणि भगवान गणेशाचे भव्य मंदिर बांधावे असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आम्ही शिवशक्ती पॉइंटकडे शिवशक्ती धाम म्हणून पाहत आहोत. हिंदू महासभा, संत महासभेच्या वतीने मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं. तसेच शिवशक्ती पॉइंटला त्याची राजधानी करण्याचे पत्रही पाठवत आहे. तसेच शिवशक्ती पॉइंट येथे भगवान शिव, माँ पार्वती आणि भगवान गणेशाचे भव्य मंदिर बांधावे असेही स्वामी चक्रपाणी म्हणाले.