कोल्हापूर- राज्यात ढगफुटीसारखी परिस्थिती ओढावली असल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा. या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले होते.
त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना 25 हजाराची तातडीची मदत जाहीर केली होती. आताही त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
तसेच केंद्र सरकारने देखील तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेचा कमी दाब हा महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्याने राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने तातडीची मदत जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.