बदल करण्याचा कालावधी 24 तासांहून 4 तासांवर
पुणे – रेल्वेच्या आरक्षण प्रक्रियेमध्ये 1 मेपासून नवीन “दिलासादायक’ बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी निवडलेल्या “बोर्डिंग’ स्टेशनबाबत हा बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी रेल्वे तिकीट आरक्षित केल्यानंतर बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करण्याचा कालावधी 24 तासांहून 4 तासांवर आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दि. 1 मेच्या पूर्वीच्या नियमांनुसार, प्रवाशांना रेल्वेचे तिकीट आरक्षित केल्यानंतर (रिझर्वेशन) निवडलेले “बोर्डिंग स्टेशन’ 24 तासांमध्ये बदलता येत होते. काही कारणास्तव प्रवास रद्द झाल्यास तिकीट रद्द करताना प्रवाशांना पैसे परत (रिफंड) मिळत होते. रेल्वेकडून दि. 1 मेपासून नव्याने बदल करण्यात आलेल्या नियमांमध्ये, रेल्वेचा चार्ट तयार होण्याच्या चार तास आधी प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. मात्र, चार तासांपूर्वी बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल केला आहे. पण, काही कारणास्तव प्रवास रद्द झाल्यास तिकीट रद्द करताना प्रवाशांना प्रशासनाकडून पैसे परत (रिफंड) मिळणार नाहीत, असे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.
एकदा बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल केल्यास पूर्वी निवडलेल्या बोर्डिंग स्टेशनहून प्रवास करता येणार नाही. स्टेशन बदलल्यानंतर पूर्वीच्या स्टेशनहून प्रवास केल्यास दोन्ही स्टेशनवरच्या तिकिटाचे पैसे मोजावे लागणार आहेत. तर बोर्डिंग स्टेशनमध्ये फक्त एकदा बदल करण्यात असून ऑनलाइन आणि तत्काळ तिकिटाचे आरक्षण केल्यास बोर्डिंग स्टेशन बदलता येणार नाही.