औरंगाबाद : प्रेमी युगल पळून गेल्यानंतर मुलीच्या भावांनी प्रियकराच्या भावाची मध्यरात्री निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी (14 मार्च) मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील खंडाळा या गावात घडली.
आरोपींनी प्रियकर तरुणाच्या आई-वडिलांनाही मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. रोहिदास देवकर आणि देविदास देवकर असे आरोपींची नावे आहेत. त्यांनी शनिवारी मध्यरात्री भीमराज गायकवाड या तरुणाची गळा चिरुन निघृण हत्या केली.
भीमराजचा भाऊ प्रेम प्रकरणातून आरोपींच्या बहिणीसोबत पळून गेला आहे. याच रोषातून त्यांनी भीमराजची हत्या केली. याशिवाय भीमराजच्या आई-वडिलांनावरही जीवघेणी हल्ला केला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेप्रकरणी आरोपींवर खुनाच्या गुन्ह्यासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. त्यानंतर वैजापूर पोलिसांनी एकाला खंडाळा, तर दुसऱ्याला लाख खंडाळा येथून अटक केली.
पोलिसांनी ही कारवाई अवघ्या चार तासात केली. या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.