स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तीन महिने पुढे ढकलणार
मुंबई : राज्यात करोना बाधितांची संख्या 39 वर पोहोचली असून करोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस बरोबरच आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्यात येणार आहेत.
त्याबाबतचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला दिला असून याबाबत आयोग लवकरच निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यासाठी पुढील दोन आठवडे कसोटीचे असून जनतेने पुढे येऊन स्वतंशिस्त पाळावी आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून उपाययोजनांची माहिती घेतली. जगभर धुमाकूळ घालणाऱ्या करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने राज्य सरकारने आज आणखी काही प्रतिबंधात्मक निर्णय घेतले.
यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयांची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी सरकारने नागरी भागातील शैक्षणिक संस्था 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
आज हा निर्णय ग्रमीण भागातील शाळा, महाविद्यालयांना लागू करण्यात आला. याशिवाय ग्रामीण भागातील धार्मिक यात्रा, जत्रा, उत्सव, राजकीय सभांवर निर्बंध घालण्यात आले असून लोकांनी सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली.
विभागीय आयुक्तांना 45 कोटी रुपयांचा निधी
करोना विषाणू हे जागतिक आरोग्य संकट आहे. संपूर्ण जगात करोनाचा प्रादूर्भाव झाला आहे. करोनाच्या प्रादूर्भावात तिसरा आणि चौथ्या आठवड्यात मोठी वाढ होते. न्यूर्याक, इराणमध्ये गुणाकार पध्दतीने झपाट्याने रूग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. आपल्याकडे करोनाचा रूग्ण आढळून 10 दिवस झाले आहेत.
आजच्या घडीला रूग्णांची संख्या 39 वर पोहचली आहे. त्यामुळे जनतेने जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आगामी 15 ते 20 महत्त्वाचे असून यातून आपण सुखरूप बाहेर पडलो तर खूप काही करू शकलो, असे म्हणता येईल.
त्यामुळे जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा. मंदिर, मशीद, चर्च आदी धार्मिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी धर्मगुरूंनी घ्यावी, असे ठाकरे म्हणाले. करोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सचिवांना अभ्यास करण्याची सूचना
अर्थव्यवस्था मंदीच्या फेरीत असताना करोनाच्या संकटाचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. हे लक्षात घेऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार नाही यादृष्टीने उपाययोजना सूचविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या हॉटेल्समध्ये विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरूवातीला काही निवडक हॉटेलमध्ये ही व्यवस्था झाली असून त्याचे देयक सरकार अदा करेल, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
आजपासून मंत्रालयात प्रवेश नाही !
गर्दी टाळण्यासाठी मंगळवारपासून सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संशयितांच्या हातावर शिक्का मारणार !
करोनाची बाधा असलेल्या व्यक्तीने रुग्णालयात किंवा घरी राहून त्याची इतरांना बाधा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु काही लोक याचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत, रुग्णालयातून पळून जात आहेत.
यामुळे संशयित व विलगिकरण केलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे लोक बाहेरील बाधित देशातून आले आहेत त्यांचे अ, ब व क अशा तीन प्रकारात वर्गीकरण केले जाईल. ज्यांच्यात प्राथमिक लक्षण आहेत त्यांना लगेच रुग्णालयात हलवून वेगळं ठेवले जाईल.
तर वयोवृद्ध व मधुमेह, रक्तदाब, हायपर टेन्शन असे आजार असल्याने प्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांचा दुसऱ्यया प्रवर्गात समावेश करून त्यांना 14 दिवस कॉरेंटाईन म्हणजेच विलग करण्यात येईल. तिसऱ्या प्रवर्गातील लोकांना, ज्यांच्यात कोणतेही लक्षण नाही, त्यांना घरीच विलग राहण्याचे सांगण्यात येणार आहे.
घरी कॉरंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर निवडणुकीत मारला जातो त्याप्रमाणे शिक्का मारला जाणार. जेणेकरून हे लोक बाहेर फिरताना दिसले तर लगेच लक्षात येईल. अशा लोकांनी घरात राहावं यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती :-
पिंपरी चिंचवड – 9
पुणे- 7
मुंबई – 6
नागपूर – 4
यवतमाळ – 3
कल्याण – 3
नवी मुंबई – 3
रायगड, ठाणे, अहमदनगर,औरंगाबाद – प्रत्येकी 1
एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण – 39