मुंबई – देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याने महाराष्ट्र प्रशासनही सावध झाले आहे. लातूर आणि परभणीत कोंबड्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज मुंबई आणि नांदेडमध्ये काही मृत कावळे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे प्रशासन ऍलर्ट झाले असून या कावळ्यांच्या मृत्यू मागचे कारण शोधले जात आहे.
चेंबूरच्या टाटा कॉलनी परिसरात आज दुपारी 9 कावळे मृत झाल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ मुंबई महापालिकेला ऍलर्ट केले. पालिकेची एक टीम घटनास्थळी दाखल होत मृत कावळ्यांच्या शरीरातील नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाला की नक्की कशामुळे झाला याचा शोध घेण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील मुगगाव येथे दोन दिवसांत 26 कावळे मृतावस्थेत आढळून आले. याकडे सुरुवातीला ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. मात्र अनेक कावळे मृत्युमुखी पडलेले दिसल्यानंतर ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून कावळ्यांचे मृत अवशेष ताब्यात घेतले.
दरम्यान, लातूरच्या केंद्रेवाडीत आज दुपारी 350 कोंबड्यांचा मृत्यू झाला. या कोंबड्या एकाच पोल्ट्री फार्ममधील होत्या. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली असून कोंबड्यांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहेत. दरम्यान, केंद्रेवाडीतील या पोल्ट्री फार्मच्या 5 किमी परिसरात अंडी आणि चिकन विकण्यास मनाई करण्यात आली आहे.