पुणे – गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणारी लोणावळा लोकल वाहतूक 12 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, दौंड-पुणे-दौंडदरम्यान रेल्वे सुरू करण्याचे कोणतेही नियोजन किंवा तसा उल्लेख रेल्वे प्रशासनाकडून होत नसल्याने दौंडकरांनाच सापत्न वागणूक का? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
लोणावळा लोकलला हिरवा सिग्नल मिळाला असला तरीदेखील पुणे-मुंबई, पुणे-दौंड, पुणे-बारामती-सोलापूर अशा रेल्वे गाड्या बंदच आहेत. या सर्व ठिकाणांहून पुण्यात दाखल होणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या 50 ते 60 हजारांच्या घरात आहे.
परंतु, रेल्वे प्रशासनाला याचे गांभीर्य नसून दरवेळी दौंड, बारामतीकरांना सावत्र वागणूक मिळते. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता लोणावळा लोकलच्या धर्तीवर दौंड, बारामती येथील रेल्वे गाड्या मार्गदर्शक तत्त्वे घालून सुरू कराव्यात, अशी मागणी दौंड-पुणे प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी केली.