पुणे – करोना संसर्ग, निसर्ग चक्रीवादळ आणि सप्टेंबर महिन्यात झालेला ढगफुटीसदृश पाऊस (अतिवृष्टी) यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे यंदा अतोनात नुकसान झाले आहे. त्यातून ज्यांनी पिके वाचवली त्याला गळीत कमी प्रमाणात निघाल्याने खर्चाचीही तोंडमिळवणी झाली नाही. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरूच असल्याने भरपाई कधी मिळेल याची शाश्वती नाही.
निसर्ग चक्रीवादळाच्या भरपाईचे सुमारे 77 कोटी रुपये शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले आहेत. ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी, अशी अपेक्षा आहे. यामुळे किमान रब्बी हंगामासाठी थोडे भांडवल तरी उपलब्ध होईल.
यंदा वर्षाच्या सुरुवातीला करोनाच्या संसर्गामुळे बाजार अनेक दिवस बंद राहिले. जूनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर व वेल्हे तालुक्याला बसला. यातून सावरून खरिपासाठी शेतकऱ्यांनी मोठी तयारी केली. सुदैवाने सुरुवातीला पावसानेही यंदा चांगली साथ दिली;
मात्र सप्टेंबर महिन्यात दोन-तीनदा झालेल्या अतिवृष्टीमुळे साधारणतः 10 ते 11 हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. नेमके किती नुकसान झाले, याची आकडेवारी अद्याप कृषि विभागाकडून प्राप्त झाली नाही; परंतु एवढ्या संकटांना तोंड देताना शेतकरी पुरता खचला आहे. असे असताना याच बळीराजाला रब्बी हंगामात मोठ्या अपेक्षा आहेत.
येणाऱ्या संकटांना धैर्याने तोंड देत हीच संधी समजून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याची उपलब्धता मुबलक आहे. खरीप वाया गेल्याने रब्बी हंगामाची तयारी महिनाभर अगोदरच करता येणार आहे. कृषि विभाग तसे नियोजन करीत असले तरी शेतकरी आपापल्या स्तरावर पिकांबाबत आडाखे बांधत आहे.
गेल्या काही वर्षांचा विचार करता जिल्ह्यात सिंचनाची सोय चांगल्या प्रकारे झाल्याने खरिपापेक्षा शेतकऱ्यांना रब्बी हंगामातच चांगला फायदा मिळत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडून पारंपरिक पिकांबरोबरच नगदी पिकांनाही प्राधान्य दिले जात आहे.
खरीप हंगामात अतिवृष्टीने नुकसान झाले हे खरे असले तरी, ते काही भागातच मोठ्या प्रमाणावर झाले आहे. काही भागात उत्पादन कमी प्रमाणात निघाले आहे. झालेल्या पावसाचा बऱ्याचशा पिकांना फायदादेखील दिसत आहे. त्या ठिकाणी पिके चांगली आली आहेत. रब्बी हंगामाचे नियोजन कृषि विभागाकडून चांगल्या प्रकारे केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या (बुधवारी) बैठक आयोजित केली आहे.
-अनिल देशमुख, जिल्हा कृषि अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेडून कर्जवाटप सुरू
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पुरेसे भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मार्फत व सोसायट्यांकडून कर्जवाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. साधरणतः 551 कोटी 14 लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. जिल्हा बॅंकेच्या 266 शाखा तसेच 1282 सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून हे पीककर्ज उपलब्ध होणार आहे. सध्या बॅंकेकडून तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळत आल्याने शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे.