चिनी ऍप्स्वर बंदी घातल्यानंतर भारतात तंत्रज्ञानविषयक पोकळी जाणवेल, अशी भीती काहीजणांकडून व्यक्त केली जात होती. त्याच वेळी गुगलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीने भारतात 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारतीय चलनात या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे 75 हजार कोटी रुपये इतके आहे. या गुंतवणुकीमुळे “डिजिटल इंडिया’च्या घोषणेला बळ मिळणार असून, ती प्रक्रिया गतिमान होणार आहे. चिनी तंत्रज्ञानाला नकार दिल्यानंतर या क्षेत्रातील मोठ्या जागतिक कंपन्या भारतात संधी शोधत आहेत.
करोनाचे संकट आणि त्यामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे मंद झालेली अर्थव्यवस्थेची वाटचाल, या पार्श्वभूमीवर येत्या पाच ते सात वर्षांत गुगलकडून होत असलेली ही गुंतवणूक खूप महत्त्वाची ठरते. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनंतर या गुंतवणुकीची घोषणा केली. ही गुंतवणूक खूप मोठी नसली तरी जगातील इतर कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेला विश्वास वाढविणारी नक्कीच आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाधारित युगातसुद्धा या गुंतवणुकीचे महत्त्व मोठे आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ही गुंतवणूक होईल आणि डिजिटायझेशनच्या प्रक्रियेची गती भारतात प्रचंड वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. चिनी तंत्रज्ञान कंपन्यांना नकार देणे भारतालाच महागात पडू शकते, अशी एक मांडणी केली जात होती. थोड्याफार प्रमाणात त्यात तथ्यही आहे; परंतु “आत्मनिर्भर भारत’ मोहिमेची घोषणा झालेली असतानाच तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी भारतात गुंतवणूक करते, ही बाब अशा भारतीयांच्या मनातील भीती दूर करणारी ठरते.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत चांगल्या ऍप्स्ची निर्मिती होणेच केवळ पुरेसे नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील डिजिटलीकरणाची प्रक्रिया गतिमान होणेही आवश्यक आहे. गुगलची गुंतवणूक विविध पातळ्यांवर होणार असल्यामुळे देशातील कित्येक क्षेत्रांतील डिजिटलीकरणाची वाट सुकर होण्याची चिन्हे या निर्णयातून दिसू लागली आहेत. या क्षेत्रातील कंपन्यांना भारतात चांगले भवितव्य असल्याची खात्री पहिल्यापासूनच वाटत होती.
करोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वीच ऍमेझोन या डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील अवाढव्य कंपनीने भारतात एक अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची इच्छा प्रकट केली होती. त्यानंतर भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या फेसबुकनेही रिलायन्स जिओबरोबर करार केला. मायक्रोसॉफ्टनेही भारतात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली असून, भारतातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याच्या दिशेने मायक्रोसॉफ्टचे हे पहिले पाऊल आहे. या सर्व घडामोडींवरून एक गोष्ट ठळकपणे दिसून येते ती अशी की, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील नावाजलेल्या कंपन्यांना भारतातील गुंतवणूक सुरक्षित वाटते आहे.
या क्षेत्रात भारताची वाटचाल येत्या काही दिवसांत अधिक गतिमान होणार असल्याचे हे संकेत आहेत. एक गोष्ट मात्र खरी, की गुगल आजमितीस जागतिक गुंतवणूक वाढविण्याच्या प्रयत्नांत आहे. जगभरात सर्वच ठिकाणी कंपनी गुंतवणूक करीत आहे आणि त्या तुलनेत भारतात होत असलेली गुंतवणूक फार मोठी नाही.
तथापि, “गुगल फॉर इंडिया डिजिटायजेशन फंड’ असे या गुंतवणुकीस म्हटले गेले आहे, हे विसरता येत नाही. जानेवारी ते जुलै या कालावधीत गुगलने जगभरात सुमारे 900 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. इंडोनेशियातील गोजेक या स्टार्टअपमध्ये गुगलने दीड अब्ज डॉलर गुंतविले आहेत तर लिफ्ट या राइड शेअरिंग फर्ममध्ये एक अब्ज डॉलर गुंतविले आहेत. ऍलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीत गुगलने एक अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून, उबरमध्ये 1.4 अब्ज डॉलर गुंतविले आहेत.
भारतात केलेली गुंतवणूक हा गुगलच्या विस्तारातील एक छोटासा हिस्सा आहे, असे यावरून दिसून येईल. तथापि, अन्य मार्गांनी आणि अन्य क्षेत्रांमध्ये परदेशी गुंतवणूक यावीशी वाटत असेल तर गुगलसारख्या दिग्गज कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीमुळे अन्य कंपन्यांचा विश्वास वाढतो आणि त्या दृष्टीनेसुद्धा ही गुंतवणूक महत्त्वाची ठरते. या पाठोपाठ अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करू पाहतील आणि त्यायोगे करोनाकाळात घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यास मदत होईल, असे आर्थिक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. या गुंतवणुकीचा आणखी एक पैलू आपण विचारात घेतला पाहिजे.
तो म्हणजे, कोणत्या क्षेत्राच्या डिजिटलीकरणासाठी ही गुंतवणूक वापरली जाणार, हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक भारतीयाला त्याच्या भाषेत माहिती पुरविण्याचा आपला उद्देश आहे, असे गुगलने म्हटले असून, स्वस्त इंटरनेट सर्वांपर्यंत पोहोचविण्याचाही हेतू आहे. तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांमध्ये डिजिटलीकरणाची वाट या गुंतवणुकीमुळे सुकर होऊ शकते, असे मानले जाते.
विशेषतः छोट्या आणि मध्यम उद्योजकांना सक्षम बनविणे, डिजिटल साक्षरतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला डिजिटलीकरणाच्या माध्यमातून बळकटी देणे आणि वादळे, पूर अशा नैसर्गिक आपत्तींची सूचना वेळेवर मिळण्याची व्यवस्था करणे, असे काही उद्देश सांगितले गेले आहेत.
प्रस्तावित गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये आल्यास निश्चितच भारताचा फायदा अनेक मार्गांनी होईल. गुंतवणुकीमागे जे उद्देश सांगितले गेले आहेत, त्यासाठीच ती उपयोगात आणली गेली तरच डिजिटल संतुलन निर्माण होईल, तसे न झाल्यास चमकता भारत आणि दुर्लक्षित भारत यातील दरी आणखी वाढण्याचा धोका आहे.
त्याचप्रमाणे अशा गुंतवणुकीसंदर्भात लोकांच्या मनात असलेले संशयही दूर व्हायला हवेत. चिनी कंपन्या गेल्या आणि अमेरिकन कंपन्या आल्या, असे व्हायला नको. डेटा सुरक्षेबाबत ठोस कायदे करणे गरजेचे आहे. अशा कंपन्या एकाधिकार प्रस्थापित करण्यासाठीच स्वतःचा विस्तार करीत असतात. अशा माध्यमांचा प्रभाव समाजावर सखोल होत असतो आणि निर्णयप्रक्रियाही अशा माध्यमांच्या हस्तक्षेपाद्वारे होऊ शकते.
खासगी माहितीच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून, गुंतवणूक आल्याच्या आनंदात धोक्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डेटा सुरक्षिततेसंबंधी सर्वच महत्त्वाच्या देशांनी कायदे केले असून, भारतात मात्र अशा कायद्यांचा अभाव जाणवतो. ही पोकळीही तातडीने भरून काढली पाहिजे.