नवी दिल्ली – देशात बहुतांश विद्यापीठांनी अंतिम वर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे, तर 177 विद्यापीठांनी मात्र याबाबत अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या करोनाच्यामुळे अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना हा संवेदनशील विषय राजकीय मुद्दा बनलेला आहे.
देशात एकूण 993 विद्यापीठे आहेत. यातील 640 विद्यापीठांच्या प्रतिसादावर यूजीसीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशातल्या 182 विद्यापीठांनी आधीच अंतिम वर्गाची परीक्षा (ऑनलाईन किंवा ऑफलाईन) घेतलेली आहे. तर देशातील 234 विद्यापीठं ही परीक्षा येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेण्याच्या विचारात आहेत. त्यासोबतच ज्या विद्यापीठांना याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही, त्यांचीही संख्या मोठी आहे. देशात 177 विद्यापीठांनी याबाबत अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
दरम्यान, अंतिम वर्गाच्या परीक्षा हा सध्या अनेक राज्यांमध्ये वादाचा विषय बनलेला आहे. याबाबत यूजीसीने 6 जुलैला सुधारित गाईडलाईन्स जाहीर केल्या आणि परीक्षा जुलैऐवजी सप्टेंबरपर्यंत घ्याव्यात अशी सूचना केली. मात्र महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा या राज्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. पण यूजीसीने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे म्हटले आहे.