अपघाताची मालिका होणार खंडित
वाई – वाई-पाचगणी घाटातील रेशीम केंद्राजवळ असणाऱ्या धोकादायक वळणामुळे वारंवार अपघातांच्या घटना घडत होत्या. त्यामुळे हे वळण काढण्याची मागणी होत होती. प्रशासनाने या मागणीची आणि वारंवार होत असलेल्या अपघातांची दखल घेऊन हे काढून रस्ता सरळ करण्याचा निर्णय घेतला असून सध्या हे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
वाई पाचगणी घाटातील रेशीम केंद्रालगत असणाऱ्या अपघाती वळणांवर आजपर्यंत झालेल्या भीषण अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा अपघात समितीला यासंदर्भात अहवाल तयार करून पाठविला होता. या अपघात समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात.
तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांचाही या समितीत समावेश असतो. या समितीने वाई-पाचगणी घाटातील अपघाती वळणे हटविण्यास परवानगी दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करुन धोकादायक वळण हटवून सरळ करण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे.
वाई पाचगणी घाटातील रेशीम केंद्राजवळ आजपर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्व. त्यामुळे हे वळण काढून रस्ता सरळ करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. या अपघाती वळणाबाबत अनेक तक्रारीसुध्दा दाखल केल्या होत्या.
त्या अनुषंगाने बांधकाम विभागाने त्वरित दाखल घेवून योग्य निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ही दोन असणारी वळणे सरळ करण्यासाठी व रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी 82 लाखांचा निधी मंजूर केला असल्याने घाट दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर चालू असून लवकरच ही धोकादायक वळणे हटविण्यात येणार आहेत.
राज्यासह देश, विदेशातून पाचगणी, महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची सख्या मोठी आहे. अनेकवेळा घाट अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. त्याचप्रमाणे धोकादायक वळणांवर अपघात होऊन न भरून निघणारे नुकसान झाले आहे, त्यावर उपाय म्हणून धोकादायक वळणे काढून रस्ता सरळ केला आहे. या ठिकाणची झालेली वृक्ष तोडीच्या दुप्पट झाडे याचा घाटात लावण्यात येवून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाणे घेतली आहे.
श्रीपाद जाधव उपभियंता बांधकाम विभाग वाई.