मुंढवा, (मनोज गायकवाड) –केशवनगर येथे मुळामुठा नदीपात्रात जुन्या बांधकामांचा राडारोडा तसेच कचरा टाकला जात असल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला असून पावसाळ्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण होऊन मुंढव्यात नदीलगतच्या परिसरात पाणी शिरण्याचा मोठा धाका आहे. त्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी टाकण्यात आलेला कचरा तातडीने उचलणे गरजेचे ठरत आहे.
मुंढव्यात नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढिग साचले आहेत. यामुळे पाणी प्रवाहात अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता असून पावसाळ्यात पुराचा फटका नदीलगतच्या परिसराला बसू शकतो. नदीपात्रात टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे पात्राची रुंदीही कमी होत आहे.
केशवनगर भागात अनेक ठिकाणी नदीपात्रात बेकायदेशीरपणे राडारोडा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. ऑस्कर इंग्लिश मीडियम स्कूलजवळ नदीपात्रात जुन्या बांधकामांचा राडारोडा टाकण्यात आला असून तेथेच कचराही टाकला जात असल्याने तेथे मोठा भराव तयार झाला आहे. रोडारोड्याच्या ढिगावरून पाय घसरून पडल्यास गंभीर दुखापत अथवा एखादी व्यक्ती नदीत बुडूही शकते. मोठी दुर्घटना होण्यापूर्वी नदीपात्रातील भराव पालिकेने इतरत्र हलवावा व नदीपात्र स्वच्छ करावे, अशी मागणी नागरिकांनी लेखी पत्राद्वारे महापालिकेकडे केली आहे.
प्रशासनाला सांगूनही या प्रश्नी दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने याकामी तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा स्वतः जनतेला घेऊन आंदोलन करणार आहे.
– पूजा कोद्रे, नगरसेविका
नागरिक म्हणतात की….
प्रकाश बाजीराव घोरपडे : नदीपात्रात कचरा टाकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिका कर घेते. परंतु सुविधा देत नाही.
वैशाली खुणे : कचऱ्यासाठी लोखंडी पेट्या ठेवाव्यात म्हणजे रहिवासी त्यात कचरा टाकतील. डुकरांचा प्रचंड नाहक त्रास होत आहे. नागरिक कर भरूनही घराभोवती दुर्गंधी नांदत आहे. स्वच्छता विभाग काय करतोय.
अनिल भांडवलकर : भराव हटविण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. महापालिका आयुक्तांनी स्वतः स्थळ पाहणी करावी व नदी पात्रातील भराव व राडारोडा तत्काळ उचलण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा हरित क्रांती न्यायालयात दाद मागण्यात येईल.