काही दिवसांपूर्वीची घटना आहे. मी सोलापूरला निघालो होतो. सकाळी 9.30 ची इंटरसिटी गाठायची होती. घरातून निघालो. वाटेत एक दोन मंदिरे लागली. मला गाडी पकडायची होती. मी दुरूनच धावता नमस्कार केला. देवाकडे काही मागावं असा विचारही मनात आला नव्हता. प्रत्येक श्वास तोच तर देतो. मग आणखी काय मागायचे? पण निवांत असणारी मंडळी देवळात जात होती. मंदिराला फेरी मारताना देवाभोवतीची आपली मिठी अधिक घट्ट करीत होती. चांभाराच्या दुकानात जोडे असायचेच, तसे देवाच्या दारी भिकारी. कुठल्याही देवळासमोर जा. भिकारी असतातच. देवदर्शन करून बाहेर येणारी मंडळी खिसा चाचपून रुपयाचं नाणं बाहेर काढत होती. निरखून दोन रुपयाचं तर नाही ना याची खात्री करून घेत होती. भिकाऱ्याच्या ताटात नाणं टाकत होती. भिकारीही भरल्या तोंडाने “देव तुमचं भलं करो’ असा आशीर्वाद देत होता. पदरी पुण्य पडल्याच्या आत्मिक समाधानाने दर्शनाला आलेला माणूस घराकडे मार्गस्थ होत होता.
मी बस पकडली आणि बसच्या चाकाबरोबर माझे विचार सुद्धा धावू लागले. माणूस देवादारी धाव घेतो. तो याचक म्हणून. देवाला काही मागत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. पण देवाला नमस्कार करून निघताना, भिकाऱ्याच्या ताटात भीक घालताना आपल्या पुण्याच्या गाठोड्यात आणखी भर पडावी अशीच अपेक्षा असते प्रत्येकाची. तसे तर भाविक आणि भिकारी दोघेही याचकच. एकाला देवाची दया हवी असते आणि दुसऱ्याला भाविकांची. देवदारी प्रत्येकजण भिकारी असतो. आत जाणारा आणि दारात बसणाराही. तिरुपतीला, शिर्डीला, सिद्धिविनायकाला कोट्यवधीचं दान मिळत असल्याच्या बातम्या येतात. ज्याचा जन्म याचकाचा तो काय दान देणार देवाला?
ठेविले अनंते तैसेचि रहावे
चित्ती असू द्यावे समाधान
हे संत तुकारामांना कळालं. म्हणून ते स्वतःच्या घरातलं धान्य गोरगरिबांना वाटून मोकळे झाले. असं वाटून टाकणं म्हणजे दान. गरजवंताची गरज ओळखून त्याची गरज भागवणं म्हणजे दान. रक्तदान, नेत्रदान, देहदान हे खरं दान. शरीरात रक्त जास्त झालं म्हणून कोणी रक्तदान करत नाही. आणि मेल्यानंतर का असेना पण आपण कोणाच्यातरी उपयोगी पडू, असं ठरवून देहदान, नेत्रदान करणारी मंडळी खरी दानकरी. इतर जीवांना मात्र अखेरच्या श्वासापर्यंत विरक्ती येत नाही. त्यांना समाधान हवं असतं. त्यांना संपत्ती हवी असते. त्यांना सुखसुविधा हव्या असतात. सगळ्या सुखांनी पायाशी लोळण घेतल्यावरही माणसाची याचना थांबत नाही. सुखाचा उपभोग घेण्यासाठी तो ईश्वराकडे श्वासांची भीक मागत राहतो. अगदीच यातना असह्य झाल्या तर मृत्यूची भीक मागतो. तुमचं माझं मन, आपल्या समोर लोळण घेणारी सुखं पाहून समाधान पावत असतं. तर भिकाऱ्याला पुढ्यात जमा होणारा रुपया दोन रुपयांचा खुर्दा सुखावत असतो. देवदारी बसणारा भिकारी, तिथे आल्याबरोबर देवाकडे “मला आज खूप भीक मिळू दे.’ अशी याचना करत असेल का? मला वाटतं नसेल करत. नमस्कार सुद्धा करत नसेल देवाला. पण त्याच्यासमोरून जाणाऱ्या प्रत्येक भाविकाकडे तो अत्यंत आशेने पाहत असतो. प्रत्येकाकडे याचना करत असतो. भाविक रुपया दोन रुपयाचं नाणं त्याच्या हाती टेकवतात. भिकारी आशीर्वाद देतो आणि भाविक समाधानाने पुढल्या दिनक्रमाला सुरुवात करतात. देवाचा आशीर्वाद हा महिन्याचा पगार आणि भिकाऱ्याच्या आशीर्वाद बोनस वाटत असावा भाविकांना.
बसमधून उतरलो. रस्त्यावर ठिकठिकाणी नेहमीचे भिकारी दिसत होते. फ्लॅटफॉर्मवर गेलो तिथेही प्रवांशांच्या गर्दीत एकजीव झालेले भिकारी दिसत होते. गाडी येण्यापूर्वीच फलाटावर आलो होतो. वर्तमानपत्र घेतलं. त्यात डोळे खुपसले. समोरून भिकारी जात येत होते. माझ्यासमोर रेंगाळत होते. पण मी काही वर्तमानपत्रातली मान वर काढत नाही हे पाहून पुढे जात होते. हातीपायी धडधाकट असणाऱ्या मंडळींना भीक घालणं म्हणजे त्यांच्यातील कार्यशक्तीचा खून करणेच आहे असे वाटते मला. भीक मिळाली नाही तर ही मंडळी आपोआप हातपाय हलवतील. काहीतरी कामधंदा करतील असे वाटते मला.
गाडी आली. उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांची झुंबड उडाली. मुग्यांसुद्धा खूप शिस्तीने वागतात माणसापेक्षा. अगदी काही संकट आलं तरी माणसाएवढ्या सैरावैरा धावत नाहीत मुंग्या. माझी सीट आरक्षित होती पण तरीही ती गाठताना माझा घाम निघाला. गाडीत खच्चून गर्दी होती. साधं तिकीट असणारे खुशाल आरक्षित डब्यात शिरले होते.
एखादं दुसरं अनारक्षित सीट पदरात पडतंय का यासाठी धावपळ सुरू होती. ते मिळालं तर मिळालं. नाहीतर नाही, पण सामान्य डब्यात जीव गुदमरण्यापेक्षा इथे बरं हाच विचार अनेकांच्या मनात असतो. गाडी सुटली की फेरीवाल्यांची लगबग सुरू होते. 15 रुपयांची पाण्याची बॉटल 20 रुपयांना विकली जाते. किमतीपेक्षा पाच रुपये अधिक घेताना ते पापपुण्याचा विचार करत नाहीत. फेरीवाल्यांच्या मागोमाग हात पसरत याचना करणाऱ्या भिकाऱ्यांची रांग लागते. एक येऊन गेला की पाच मिनिटांत दुसरा समोर येतो. त्याच्यामागून तिसरा. अनेकदा आई पुढे आणि अंतर राखून मुले अशी रीघ लागते. प्रवास संपतो, तेव्हाच ही भिकाऱ्यांची रांग संपते. बऱ्याचदा ही भीक मागणारी मंडळी अत्यंत तरुण आणि धडधाकट असतात. कंबर तुटेपर्यंत कष्ट करण्यापेक्षा अशा विनासायास पैशांची त्यांना चटक लागलेली असते. अगदी काही नाही म्हटलं तरी दिवसभरात चारपाचशे रुपयांचा खुर्दा सहज जमा होत असतो. अशा मंडळींना दिलेली भीक दान कशी मानता येईल आणि त्यातून ओंजळीला पुण्य कसं येईल?
क्रमश :
विजय शेंडगे