पाबळ परिसरात अधिकाऱ्यांकडून मनमानी : अपुरे मनुष्यबळ
पाबळ – एका वर्षांत दोन वेळा संकटाला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांना आता पंचनाम्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. पाबळ भागातील शेतकऱ्यांनी शासकीय अधिकारी मनमानी करीत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. किमान पंचनामे तरी पदरात पडावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी रेटून धरली आहे.
जिथे आजही अवकाळी पावसाचे पाणी दिसत असेल, त्याच शेतीचा पंचनामा करणार आहे. आम्ही येऊन गेलो, तुम्ही हजर नव्हते. आता पंचनामे करणार नाही, फोटो आणू नका, सगळे क्षेत्र बाधित नाही. त्यामुळे ठराविक क्षेत्राचे पंचनामे होतील, अशी ताठर भूमिका अधिकारी घेत असल्याने शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली आहे.
बाधित पिकांच्या पंचनाम्याकडे अधिकाऱ्यांची पाठ
दरम्यान, सुरूवातीला पाण्यात असलेल्या क्षेत्राचे पंचनामे करून अधिकारी पुन्हा फिरकत नसल्याने उरलेल्या बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामेच झाले नाहीत. नुकसान भरपाई कशी मिळणार, आधीच नुकसान झाले आहे. त्यातही न्याय मिळत नाही, अशा तक्रारी केल्या जात आहेत. सहा ते आठ एकर क्षेत्र बाधित होऊन एक दीड एकरचेच पंचनामे करून अधिकारी जात असल्याने शेतकऱ्यांनी सांगितले.
एक ते दीड एकरांच्या पंचनाम्यावर अधिकाऱ्यांची बोळवण
मागील कर्जमाफीवेळी झालेली कर्जमाफीची रंगीत तालीम, आता अतिपावसाने फाटलेले आकाश, त्यातून शेतकऱ्यांची फरफट, पंचनाम्यास होणारा विलंब यासह कर्जमाफी मिळूनही सातबारा कोरा का नाही, असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत.
चार दिवसांपूर्वी तलाठी, कृषी अधिकारी येऊन गेले आहेत. मग फोटो आणा म्हणाले, आता फोटो नको म्हणाले. सगळंच उजाड झालंय, आता तरी मदत मिळायला पाहिजे नाही तर जगणं मुश्किल होणार आहे.
– बाळासाहेब थोरवे, शेतकरी
माझा आठ एकर कांदा पूर्ण वाया गेला आहे. तर शेतातील पाणी वाहून गेले आहे. मग पाणी नाही तर त्याचा पंचनामा कधी होणार आहे. त्यात पाण्यामुळे कांद्याची पात दिसत असली तरी मुळामध्ये सडला आहे. त्यामुळे पाच टक्के कांद्याचे पीक मिळाले तरी ते सडलेले असणार आहे. यासाठी पाहणी करून पंचनामे व्हायला पाहिजे. नाहीतर शेतकरी भरपाईला मुकणार आहे.
-संतोष कडलक, शेतकरी
पाण्यातील पीकांचे पंचनामे होत असून बाधित क्षेत्रांची अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित पाहणी होत आहे. शेतकरी म्हणतात तसा काही प्रकार कामकाजाबाबत नाही. पाबळचे क्षेत्र मोठे आहे. त्यात मनुष्यबळ कमी पडत असल्याने वेळ लागत आहे. तर सुरूवातीला पाण्याखालील क्षेत्राचे पंचनामे करीत आहोत. त्यानंतर उर्वरित पंचनामे करणार आहोत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मुदत व मनुष्यबळ वाढवून मागितले आहे.
– आर. डी. भोसले, कृषी अधिकारी, शिरूर
काही झाले तरी सर्वांच्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार वेगाने काम सुरू आहे. मुदतवाढ मिळणे अपेक्षित आहे. याशिवाय शेतात पाणी असणे नसणे असा काही प्रकार नाही. उर्वरित सर्व पंचनामे पिकांची परिस्थिती पाहून केले जातील, याची खात्री बाळगावी.
– अभिजित जोशी, तलाठी, पाबळ