पुणे – घाटमाथ्यावरील पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्याने मागील वर्षीची सरासरी गाठली आहे. गेल्या आठवडाभरात धरणातून जवळपास अर्धा टीएमसी पाणी मुठा उजवा नवीन कालवा तसेच मुठा नदीत सोडण्यात आले आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने यंदा सोमवारी सायंकाळी पहिल्यांदा विसर्ग सुरू करण्यात आला. नंतर पाऊस कमी झाल्याने बुधवारी विसर्ग थांबवण्यात आला.
मात्र, गुरूवारी सकाळी आणि नंतर रात्री 4 हजार क्यूसेक विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला. मात्र, शुक्रवारी पहाटेपासून पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शुक्रवारी दुपारी विसर्ग थांबवण्यात आला. धरणसाखळीत पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही चार धरणे असून, या त्यांची एकूण साठवण क्षमता 29.50 टीएमसी आहे.
तर या चारही धरणांमध्ये खडकवासला धरणाची क्षमता सर्वांत कमी 1.92 टीएमसी इतकी आहे. एकूण धरणासाठा कमी असला, तरी खडकवासला धरणातून पाणी सोडावे लागते. खडकवासला धरण 85 टक्के भरल्यानंतर लगेचच कालव्यातून 1 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर मुठा नदीत पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन पाणी सोडले जात आहे.