वाई (प्रतिनिधी) – शनिवारी झालेल्या मुसळधार पावसात सोनजाई डोंगरावरील काळुबाई मंदिरावर वीज पडल्याने मंदिराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कळसासह बांधकामाचे पडझड झाली असून महसूल विभागाने त्वरीत पंचनामा करुन दुरुस्तीसाठी भरपाई द्यावी, अशी मागणी मंदिराचे ट्रस्टी व विश्वस्त मंगल गिरी महाराज, तुकाराम गिरी महाराज, कुंडलिक गिरी महाराज यांनी केली आहे.
अधिक माहिती अशी, शनिवारी सकाळी साडेपाच वाजता मंदिराचे विश्वस्त मंगलगिरी महाराज हे सोनजाई देवीची व काळूबाई देवीची महाआरती करून मंदिराच्या बाहेर पडले आणि काळूबाई मंदिराच्या घुमटावरील कळसावर वीज कोसळली. त्यामुळे घुमटावरील कळस कोसळला तर संपूर्ण घुमटाला चारही बाजूंनी तडे गेले आहेत,
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, संपूर्ण घुमट पूर्णपणे उतरवून पुन्हा बांधणी करून त्यावर कळस बसवावे लागणार आहेत, त्यासाठी लाखो रुपये खर्च अपेक्षित आहेत, सोनजाई डोंगरावर भाविकांची मोठी गर्दी असते, सध्या लॉकडाऊन असल्याने मंदिर परिसरात वर्दळ कमी होती, बाकी दिवशी मंदिरातील आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी असते, तरी महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून जास्तीत-जास्त भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर समाजतील सर्वच स्तरातील नागरिक संपूर्ण लॉकडाऊन असल्याने मेटाकुटीला आलेले आहेत, त्यातच अशा पद्धतीचे नुकसान उभारी देणारे नाही, गेले तीन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात शेतीचे, पाण्याच्या स्कीम, घरांचे, लाईटच्या पोलचे, झाडांचे, रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.