वासुंदे- येथील परिरातील ज्वारी, गहू, कांदा, हरभरा आदी पिके तेजीत असून बागायती जमिनीतील पिके मात्र अवकाळी पावसाने पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून शेतकरी अद्यापही बाहेर आलेला नाही. मागील चार वर्षांचा दुष्काळाचा फटका आणि हक्काचे पीक देणाऱ्या बागायती जमिनी जास्तीच्या पावसामुळे पाडीक झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही सरकारी मदतीची गरज आहे.
वासुंदे (ता. दौंड) येथील परिसरातील शेतकऱ्यांना अद्यापही अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. मागील काळात सलग चार वर्षे पडला होता. अशा दुष्काळातही मागील सरकारने सर्वत्र फळबाग अनुदान व दुष्काळ मदत वाटली. मात्र, दौंड तालुक्यातील जिरायत भागात कायमच आवर्षण प्रवण भाग म्हणून ओळखला जात असून या भागातील कुठल्याही शेतकऱ्याला फळबाग अनुदान मिळाले नाही. दुष्काळात केवळ हजार-बाराशे रुपयांच्या घरात अनुदान मिळाले. यावर्षी परतीच्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रशासनाकडून पाहणीही करण्यात आली आणि पंचनामेही झाले. मात्र, अद्याप दमडीचीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही, त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या भावनांशी प्रशासन खेळत आहे का, असा सवाल येथील शेतकऱ्यांना पडला आहे.
- मागील काळात पडलेला मोठा दुष्काळ, सध्या बसलेला अवकाळीचा फटका यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदतीची गरज आहे. ही मदत प्रशासनाकडून लवकरात लवकर मिळावी, अशी प्रत्येक बाधित शेतकऱ्याची अपेक्षा आहे.
– उमेश जाबंले, शेतकरी, वासुंदे