वाघोली -येथील ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून असलेली शेकडो दगडखाण कामगारांची घरे पाडण्याची वाघोली ग्रामपंचायतीने कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे बेघर होणाऱ्या भूमिहीन दगडखाण कामगारांसाठी ऍड. बस्तू रेगे यांनी शुक्रवारी (दि. 21) ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
वाघोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत दगडाच्या अनेक खाणी आहेत. या खाणीमध्ये काम करण्यासाठी देशाच्या विविध भागातून दगडफोड कामगार आलेले आहेत. ते येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण करून मागील अनेक वर्षापासून राहत आहेत. हे भूमिहीन कामगार आता वाघोली ग्रामपंचायतीचे नागरिक आणि मतदार देखील झाले आहेत. वाघोली ग्रामपंचायतीने 15 ऑगस्ट 2017 रोजी या दगडखाण कामगारांना प्रत्येकी एक गुंठा जमीन देण्याचा ठराव देखील बहुमताने मंजूर केला होता.
परंतू भाजपच्या कार्यकाळात तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी 16 फेब्रुवारी 2018 रोजी खाण कामगारांना घरे बांधण्यासाठी जागा देताना काही जाचक अटी लागू केल्या होत्या. त्यानुसार 2000 सालच्या आधीच्या अतिक्रमण धारकांना 500 चौरस फूट जागा दिली जाणार तर 2001 ते 2011 दरम्यानच्या अतिक्रमण धारकांना रेडीरेकनर करानुसार शासनाला मोबदला द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर 2011 नंतरची अतिक्रमणे पाडण्याचे देखील आदेश काढले आहेत.
त्यामुळे जवळपास 700 कामगारांची घरे पाडली जाणार आहेत. कामगारांचा या कार्यवाहीला विरोध असून उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या लावून धरल्या आहेत. त्यात प्रत्येक कामगाराला एक गुंठा जमीन मिळावी, अतिक्रमण धारकांचे पुर्नसर्व्हेक्षण करून बिनचूक यादी तयार करावी, कामगारांची घरे बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजना, तसेच बांधकाम इमारत निधी, खनिज विकास निधी देण्यात यावा, घरांचे सुसज्ज बांधकाम झाल्याशिवाय ग्रामपंचायत कर लागू करू नये व भाजप शासन काळातला 500 चौरस फूट जागा देणारा निर्णय रद्द करावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.
मोठ्या आंदोलनाला परवानगी नसल्याने ऍड. बस्तू रेगे यांनी मोजक्या चार कामगारांसोबत हे आंदोलन सुरू केले आहे.