पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील रिंगरोड, मेट्रो प्रकल्प, रेल्वे प्रकल्प, इंद्रायणी मेडिसिटी, पुरंदर विमानतळ, खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत जलवाहिनी अशा विविध काम कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात वर्चस्व राखायचे असेल, तर पालकमंत्री पदही आपल्याकडे असणे अजित पवारांना महत्त्वाचे ठरते. शिवाय त्यांना जिल्ह्याची इत्यंभूत माहिती आहे. गावोगावीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची ओळख आहे. अजित पवार यांनी यापूर्वीही ही जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद होते. करोना काळात पवार यांनी चांगले काम केले.
पुणे जिल्हा हा राज्यातील सर्वांत महत्त्वाचा जिल्हा आहे. उद्योग-व्यवसाय, सहकार या क्षेत्रात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. तसेच राजकीय वर्चस्व राखण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री पद हे आपल्याकडेच रहावे, यासाठी पवार आग्रही होते. त्यानुसार पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.