नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीने समोर आलेल्या आव्हानांचा सामना करायला आवडते, अशा शब्दात आपले मत व्यक्त केले आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सलामीचा सामना जिंकल्यानंतर पुढील सामना खेळण्यासाठी कोहलीसह संपूर्ण भारतीय संघ राजधानीत दाखल झाला त्यावेळी माध्यमांशी बोलताना विविध मते मांडली.
या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत फिरकी गोलंदाजांनी तसेच वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 199 धावांवर रोखले तेव्हा आम्ही निचिंत झालो होतो. मात्र, ज्यावेळी 2 धावांवर तीन फलंदाज आम्ही गमावले तेव्हा तणाव वाढला. स्पर्धा मायदेशात होत आहे, त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर सरस कामगिरी करणे अत्यंत गरजेचे असते. त्यातही त्यांच्या खेळाडूंकडून खूप मोठ्या अपेक्षा असातात. जेव्हा विजयासाठी 200 धावांची गरज होती तेव्हा पहिले तीन फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत हा मोठा गंभीर क्षण होता. यातून बाहेर येण्यासाठी काही षटके कसोटी क्रिकेटप्रमाणे संथ व सावध फलंदाजीची गरज होती व तेच आम्ही केले, असेही कोहली म्हणाला.
राहुल जेव्हा खेळपट्टीवर मला साथ द्यायला आला तेव्हाही मी त्याचा हेच सांगितले. काही षटके धावा नाही झाल्या तरीही चालतील परंतू बाद व्हायचे नाही. खेळपट्टीवर टीकून राहायचे. ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांचे पहिले स्पेल संपले की आपोआप धावा होतील. सुरुवातीला एकेरी व दुहेरी धावांवर भर देत आम्ही स्ट्राइक बदलत राहीलो. त्यांच्या खराब चेंडूवर मोठे फटकेही मारले. मात्र, त्यातही कमीत की धोका पत्करुन फलंदाजी करण्याचेच ध्येय समोर येवले होते. अशाच आव्हानांचा सामना करायला आवडते, असेही कोहलीने सांगितले.
राहुलने जबरदस्त धिरोदात्तपणे फलंदाजी केली. खरेतर त्याचे शतक साकार व्हायला हवे होते. अर्थात त्याचे शतक जरी पूर्ण होऊ शकले नाही तरीही त्याच्या खेळीचे महत्व जराही कमी होत नाही. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासमोर ते देखील 3 बाद 2 अशा स्थितीतून विजयापर्यंतचा मार्ग तयार करणे सोपे काम नव्हते मात्र, राहुलने दिलेली साथ अत्यंत महत्वाची होती. या सामन्यातून आम्ही खूप काही शिकलो आहोत व पुढील सामन्यांसाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे, असेही कोहलीने सांगितले.