World Cup 2023 IND vs BAN : – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील प्रचंड भरात असलेला भारतीय संघ पुणे येथे होत असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत सलग चौथा विजय साकार करण्यासाठी सज्ज बनला आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताने सलग तीन सामने जिंकत उपांत्य फेरीकडे कूच केलेली आहे. पहिल्या लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवल्यावर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. त्यानंतर परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही पराभूत करत भारताने सलग तीन विजयासह सहा गुणांची नोंद करत गुणतालिकेतही पहिला क्रमांक मिळवला आहे.
भारताची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तसेच नेतृत्व अत्यंत सरस होत असून बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही असाच खेळ करण्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. भारताची फलंदाजी भक्कम आहेच पण फलंदाजांपेक्षा गोलंदाजांनीच समोरच्या संघावर दडपण राखले आहे. डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव व अष्टपैलू रवींद्र जडेजा यांची फिरकीच समोरच्या संघांना कोड्यात टाकत आहे. त्यातच अष्टपैलु हार्दिक पंड्यालाही सुर गवसल्यामुळे भारतीय फलंदाजीला खोली आली आहे.
विशेष म्हणजे भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराहने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम बुमराहच्या नावे आहे. दुखापतींवर मात करून दीर्घकाळानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केल्यानंतर जसप्रीत बुमराहला वर्ल्डकपमधील पहिल्या सामन्यापासूनच सूर गवसलेला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या आहेत. पुण्यात बांगलादेशविरूध्द होणाऱ्या सामन्यातही बुमराहकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे.
पुण्यातील मैदानावर गोलंदाजीत बुमराहचा जलवा…
पुण्याच्या एमसीए मैदानावर भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने सहा डावात 10 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराहचा क्रमांक लागतो. बुमराहने तीन डावात 8 विकेट घेतल्या आहेत. 35 धावांच्या मोबदल्यात चार विकेट, बुमराहची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. शार्दूल ठाकूरने तीन सामन्यात सात विकेट घेतल्या आहेत.
#CWC23 #INDvBAN : पुण्यातील MCA स्टेडियमवर ‘विराट कोहली’च किंग…
भारतीय संघाचे पुण्यातील रेकॉर्ड…
टीम इंडियाने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर आजपर्यंत एकूण 7 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने 4 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. या मैदानावर भारत आणि बांगलादेश वनडे फॉरमॅटमध्ये आमनेसामने आलेले नाहीत. टीम इंडियाने आपला शेवटचा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 2 वर्षांपूर्वी मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता, जो टीम इंडियाने 7 धावांनी जिंकला होता.