अहमदाबाद – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या (गुरूवार) गुजरातमधील सुरत सत्र न्यायालय फैसला सुनावण्याची शक्यता आहे. दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यास राहुल यांची खासदारकी पुन्हा बहाल होऊ शकते. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निकालाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राहुल यांनी 13 एप्रिल 2019 या दिवशी कर्नाटकमधील प्रचार सभेत बोलताना मोदी आडनावाविषयी टिप्पणी केली. त्यावर आक्षेप घेत गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी मानहानीचा खटला दाखल केला. त्या प्रकरणी सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
त्या शिक्षेमुळे राहुल यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर त्यांनी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी सत्र न्यायालयाकडे दाद मागितली. त्या न्यायालयाने आपला निकाल 20 एप्रिलसाठी राखून ठेवला. आता त्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.