- महापालिकेची यंत्रणा ढेपाळली : रोज एक हजाराहून अधिक रुग्ण भरती
- गेल्या सात दिवसांमध्ये 137 मृत्यू : रोज सरासरी 20 मृत्यू
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची यंत्रणा करोनाला रोखण्यात अपयशी ठरली आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांच्या आकडेवारीमध्येही दिवसागणिक भर पडत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये तब्बल 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानुसार रोज सरासरी 20 रुग्णांचा मृत्यू होत आहे. यामुळे शहरातील स्मशानात अंत्यविधीसाठी रांग लागत आहे. मृताच्या नातेवाइकांना वेळेत सोयी सुविधाही महापालिका पुरवू शकत नसल्याने अत्यंत दु:खाच्या क्षणी त्यांच्या भावनाची क्रूर थट्टा होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 57 हजारांच्या टप्पा पार केला आहे. शहरामध्ये दररोज सरासरी एक हजाराहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. दर दिवसांला मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे मृत्यू झाल्यानंतरही त्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर विद्युतदाहिनीमध्ये त्यांचा अंत्यविधी केला जातो. त्यासाठी शहरातील लिंक रोड, सांगवी, निगडी येथील स्मशानभूमीमध्ये केले जातात. एका मृतदेहाचा अंत्यविधी पूर्ण होण्यासाठी सुमारे दीड तास वेळ लागतो. त्यानंतर पुन्हा तेथील सफाईसाठी व इतर कामासाठी एक तास लागतो. तोपर्यत दुसरा मृतदेह स्मशानात रांगेत ठेवावा लागतो. तर नातेवाइकही हतबल होऊन अंत्यविधीसाठी ताटकळत उभे राहतात.
शहरामध्ये आतापर्यंत 1195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 सप्टेंबर रोजी एकूण मृत्यूचा आकडा 1058 इतका होता. तर 8 सप्टेंबर रोजी हा आकडा 1195 वर जाऊन पोहोचला आहे. सातच दिवसांमध्ये करोनाने 137 रुग्णांचा बळी घेतला आहे. रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर काय करायचे असते याची माहिती नातेवाइकांना दिली जात नाही. त्यामुळे नातेवाइकांची धावपळ होते. मृत्यू झाल्यानंतर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळायचा असतो. त्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मात्र ते वेळेवर येत नसल्याने नातेवाइकांना सहा-सहा तास त्यांची वाट पाहावी लागते. करोनाने मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीही वेळेत आणि व्यवस्थित होत नसल्याने नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत.
सहायक आयुक्तही ताटकळले सात तास
महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या मावस सासूंचा करोनाने मृत्यू झाला. त्यांच्या घरातील सर्वच पॉझिटिव्ह असल्याने सहायक आयुक्तांनाच अंत्यविधीची जबाबदारी पार पाडावी लागली. मात्र त्यासाठी त्यांना रात्री दोन वाजेपर्यंत वाट बघावी लागली. सायंकाळी मृत्यू झाल्यांनतर मृतदेह गुंडाळण्यासाठी कामगार लवकर आले नाही. त्यांना सहायक आयुक्तांनी चार वेळा फोन केल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता मृतदेह गुंडाळण्यात आला. त्यानंतर स्मशानभूमीमध्ये पहिलेच मृतदेह अंत्यविधीसाठी रांगेत होते. त्यामुळे सहायक आयुक्तांना रात्री दोन वाजेपर्यंत ताटकळत राहावे लागले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहायक आयुक्तांची अशी अवस्था होत असेल तर सामान्य नागरिकांबद्दल विचार न केलेलाच बरा.