राहाता – तालुक्यात जिरायत पट्ट्यात अनेक ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांची नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, मका, ऊस, पेरू या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहावयास मिळत आहे. सोंगणीला आलेली पिके वाया जाण्याचे चिन्ह दिसत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
राहाता तालुक्यात यावर्षी जून महिन्यापासूनच पावसाला दमदार सुरुवात झाली. पाऊस चांगला होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. त्यामुळे यावर्षी चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविध पिकांची लागवड केली होती. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. काढणीस आलेले पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहाता तालुक्यात गेल्या पंधरा वर्षात अशाप्रकारे पाऊस झाला नाही, असे अनेकांचे अंदाज आहे. यावर्षी पूरक हवामान असल्यामुळे पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली. सर्व गावातील ओढे-नाले ओसंडून वाहू लागले. अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आल्याने रस्त्यांवरून पाणी वाहिले.
अनेक गावातील विहिरी तुडुंब भरल्या. हाताने पाणी घेता येईल, अशीच स्थिती बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळाली. राहाता परिसरात पेरू, चिकू, डाळिंब, द्राक्षे, ऊस हे पिके मोठ्या प्रमाणात आहे. सध्या पेरू हे फळ काढण्यासाठी आले आहे. परंतु पावसामुळे या फळबागांना मोठा फटका बसला. शेतात पाणी साचल्यामुळे पेरू काढणीसाठी आलेले फळ जास्त दिवस झाडांवर राहत असल्याने ते खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे उसाचे पीक जमिनीवर झोपले आहे.
लॉकडाऊन काळामध्ये चिकू, द्राक्षे, डाळिंब या फळांना विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. परिसरातील शेतकऱ्यांना हा ओला दुष्काळ तर नाही ना, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 6 जून ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये राहाता शहरात 928 मिमी तर शिर्डीमध्ये 678 मिमी पावसाची नोंद झाली आहे.