रेडा – इंदापूर तालुक्यात वनविभागाने केलेल्या कारवाईवरून आजी-माजी मंत्र्यांनी नाव न घेता एकमेकांना टोला लगावला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या आजी-माजी लोकप्रतिनिधींमध्ये ऐन करोना काळात जुंपली असल्याचा प्रत्यय आला आहे.
विरोधकांना सामाजिक जाणीव नाही -भरणे
इंदापूर तालुक्यातील गावागावांतील नागरिक माझ्या कुटुंबातील आहेत. याच भावनेतून तमाम जनतेसाठी रात्रंदिवस मेहनत घेतो आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची करोना सारख्या दुर्धर परिस्थितीत तालुक्यातील विरोधकांना कोणताही मदतीचा हात नागरिकरणात देता येत नाही. सामाजिक कोणतीही जाणीव नाही, असा टोला सार्वजनिक बांधकाम, वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे.
गोखळी (ता. इंदापूर) परिसरामध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या कारवाईत नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या समवेत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. गावातील भैरवनाथ मंदिरात रविवारी (दि. 21) वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ, गावचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेऊन कागदपत्रे पाहत बाधित ग्रामस्थांची मते राज्यमंत्री भरणे यांनी जाणून घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर गोखळी परिसरातील नागरिकांना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, गोखळीचे सरपंच बापूराव पोळ, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, सचिन तरंगे, हरणावळे गुरूजी, सचिन वाघमोडे यांच्यासह गोखळी परिसरातील ग्रामस्थ, युवक तसेच महिला या संख्येने
उपस्थित होत्या.
“त्यांना’कारवाई टाळता आली असती -पाटील
लॉकडाऊनचा कालावधी आहे. तालुक्याचे प्रतिनिधी त्या खात्याचे मंत्री आहेत या कालावधीत ही कारवाई टाळता आली असती. त्यांची ही जबाबदारी आहे. अन्यथा भविष्य काळामध्ये याबाबतीत तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
गोखळी, राजेवडी, भरणेवाडी या गावांमधील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. यात द्राक्षबागा, पत्र्यांची बांधकामे, विकसित केलेली बागायती शेती या अतिक्रमणांवर वन विभागाने जेसीबी चालवले आहेत. मात्र या कारवाईवर शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या नुकसानग्रस्त भागात हर्षवर्धन पाटील यांनी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन गोरगरीब, मागासवर्गीय, भूमिहीन शेतकऱ्यांची घरे आणि शेती उद्ध्वस्त केली, या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. वास्तविक पाहता या कारवाईमुळे लोकांचा संसार उघड्यावर आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या लोकांनी राहायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने ताबडतोब यांना निवारा उपलब्ध करून दिला पाहिजे. माणुसकीच्या भावनेतून तसेच नोटीस देऊन नुकसान टाळता आले असते. नुकसानभरपाई द्यावी, पर्याय काढून द्यावा तसेच सहा महिने यावर कारवाई होऊ नये, असे त्यांनी नमूद केले.