- नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांसमोर केली पोलखोल
- बैठकीत सूचनांचा भडीमार
पिंपरी – शहरातील अवैध धंदे, दारू, मटका, जुगार अड्डे गुन्हेगारीचे केंद्र ठरत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवला आहे. अशा अवैधबाबींवर कारवाई करावी. शहरातील काही उद्यानांत होणाऱ्या अश्लील प्रकारास आळा घालण्यात यावा. शाळा, महाविद्यालय परिसरातील मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण विचारात घेता त्याठिकाणी पोलिसांचे भरारी पथक नियुक्त करावे, अशा विविध सूचनांचा भडीमार पदाधिकारी व नगरसेविकांनी गुरुवारी चिंचवड येथे केला. काही नगरसेविकांनी तर आपापल्या प्रभागातील जागांची नावे सांगून तिथे होत असलेल्या गैरप्रकारांची पोलखोल केली आहे.
ऑटो क्लस्टर येथे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या समवेत नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. महिला सुरक्षाविषयक बाबींबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. या बैठकीला सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. त्याशिवाय, “अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, “ब’ प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेविका सीमा सावळे, शारदा सोनवणे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह नगरसेविका बैठकीला उपस्थित होत्या.
पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी उपाययोजना करून त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन करावे. गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसवावा. पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करावे. वाहनांचे रस्त्यावरील होणारे अतिक्रमण दूर करून वाहतुकीचे सुरळीत नियोजन करावे. शहरात आवश्यक ठिकाणी चालू स्थितीतील सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
पोलिसांकडे महिला तक्रार देण्यासाठी गेल्यास तिला सन्मानपूर्वक वागणूक मिळावी. तिची तक्रार तात्काळ दाखल करून घ्यावी. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची पोलीस दप्तरी नोंद असावी. पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये दलालांचा वाढता हस्तक्षेप रोखावा, आदी सूचना बैठकीत उपस्थित पदाधिकारी व नगरसेविकांनी केल्या.
महापौर ढोरे म्हणाल्या, शहरात जर महिलांच्या छेडछाडीसारख्या घटना घडत असतील तर विकास अर्थहीन ठरतो. पोलिसांनी महिला सुरक्षेला प्राधान्य देऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था मजबुत करावी. खाकी वर्दीची जरब गुन्हेगारांवर बसल्यास महिला अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. महिलांना स्व-सुरक्षेसाठी प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवावे.
दलालांना दूर ठेवा
बैठकीत करण्यात आलेल्या सूचना आणि तक्रारींचे स्वरूप पाहता या समस्या केवळ गुन्हेगारीशी संबंधित नाही. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा बाबींशी देखील निगडित आहे. पोलीस दलातील 90 टक्के लोक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतात. मात्र उर्वरीत 10 टक्के लोकांमुळे पोलीस दलाची प्रतिम मलीन होत आहे. नियमबाह्य काम करणाऱ्या पोलिसांवर नियमाधिन कारवाई करण्यात येईल. तसेच पोलिसांच्या अवतीभोवती असणाऱ्या दलाल आणि तडजोड करणाऱ्यांना दूर ठेवण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नमूद केले. गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. नागरिकांनी न घाबरता तक्रार देण्यास पुढे आले पाहिजे. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात पोलिसांचे पथक नेमले जाईल. सराईत गुन्हेगारांवर तडीपारीसारखी कारवाईदेखील केली जाईल. पोलिसांकडून नियमानुसारच कारवाई केली जाईल. त्याची अंमलबजावणी करताना पोलिसांच्या कामात कोणीही हस्तक्षेप करू नये, असे कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.