नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या गावातील स्थिती चव्हाट्यावर आणणाऱ्या एका पत्रकारावर उत्तर प्रदेश सरकारने गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचा अलीकडच्या काळातील हा दुसरा प्रकार आहे. सुप्रिया शर्मा असे या पत्रकाराचे नाव असून त्या स्क्रोल डॉट ईनच्या संपादिका आहेत. या प्रकारावर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी जोरदार आक्षेप घेतला असून त्यांनी म्हटले आहे की, पत्रकारांवर गुन्हे नोंदवून उत्तर प्रदेश सरकारला सत्य लपवता येणार नाही. करोनाच्या लॉकडाऊनमुळे उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातील स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. ही स्थिती हाताळताना सरकारकडून मोठ्या प्रमाणावर गलथानपणा झाला आहे, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. ही वस्तुस्थिती लोकांपुढे आणल्याने त्यात सुधारणा करण्याची संधी उपलब्ध होते पण उत्तर प्रदेशचे सरकार मात्र असे काही न करता पत्रकारांवरच गुन्हे नोंदवत आहे हे लाजीरवाणे आहे असे प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे.
पंतप्रधानांनी संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत वाराणसी मतदारसंघातील डोमरी हे गाव दत्तक घेतले होते. तेथील काही महिलांच्या मुलाखती या पत्रकाराने घेतल्या होत्या. त्यातील अनेकांनी रेशनवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यात मालादेवी नावाच्या एका महिलेचीही मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे, पण आपले म्हणणे सदर पत्रकाराने चुकीच्या पद्धतीने छापल्याचे तिचे निवेदन नोंदवून घेऊन पोलिसांनी या पत्रकाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.