बंगळुरू – राष्ट्रवादाच्या निमित्ताने सुरू असलेली बडबड आता कमी केली पाहिजे, अशी सूचना माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केली आहे. गलवानमध्ये चीनने केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे, त्यालाही सरकारने प्रतिबंध घातला पाहिजे. कारण त्याचे फार दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
सरकारने चीन सीमेवरील नेमक्या स्थितीविषयी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यामार्फत विरोधी पक्षनेत्यांपुढे तपशीलवार सादरीकरण करावे, अशी सूचनाही देवेगौडा यांनी केली आहे. पंतप्रधानांनी या विषयावर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचे मात्र त्यांनी स्वागत केले आहे. चिनी मालावरील बहिष्काराच्या भाषेला सरकारने पायबंद घातला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की आपल्याला व्यवहारी मार्ग स्वीकारला पाहिजे.
राष्ट्रवादाच्या नावाने व्यर्थ बडबड करण्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे. तो वाढवू न देणे या घडीला आवश्यक आहे. ही बदला घेण्याची भाषा करण्याची वेळ नाही, असेही त्यांनी सरकारला सुचवले आहे. चीनबरोबर सुरू असलेल्या संघर्षाबाबत सोशल मीडियावरही जी भाषा वापरली जात आहे त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली असून या बाबीकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी सरकारला केली आहे.