अहमदाबाद – क्रिकेट विश्वातील धुरंधर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तानचे संघ उद्या (शनिवार) आमनेसामने येत आहेत. क्रिकेटच्या रनांगणातील त्या महामुकाबल्याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतील परमोच्च क्षणांपैकी एक असणाऱ्या त्या सामन्यामुळे क्रिकेटज्वर खऱ्याअर्थी उधाणाला येईल.
विश्वकरंडक स्पर्धा सुरू होऊन आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अजूनही म्हणावा तसा क्रिकेटज्वर चढलेला नाही. आता तो शिगेला पोहचवण्याचे काम महामुकाबला करेल. भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट लढतीला येणारे स्वरूप, मिळणारे महत्व याविषयी नव्याने भाष्य करण्याची गरज नाही. आता उद्या होणाऱ्या सामन्यामुळे खऱ्याअर्थी विश्वकरंडक स्पर्धेत रंग भरले जातील.
विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानवरील विजय भारतीय क्रिकेटप्रेमींना जणू वर्ल्ड कपच कवेत आल्याचा आनंद देऊन जातो. त्याच भावनेतून क्रिकेटप्रेमी महामुकाबल्यासाठी सज्ज झाले आहेत.
रोमहर्षक, चित्तथरारक, रोमांचकारी असा अनुभव याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी अनेकजण क्रिकेटमय बनून गेले आहेत. पावसाने रंगाचा बेरंग करू नये असे साकडे सगळेच क्रिकेटप्रेमी घालतील. विश्वकरंडक स्पर्धेत आजवर भारतच पाकिस्तानवर भारी पडला आहे. तो इतिहास जैसे थे रहावा अशीच अपेक्षा ते मनी बाळगून असतील.