- माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची भाजपची घोषणा
- राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात, “भाजपमुळेच प्रकल्प रखडला’
पुणे – महापालिकेकडून काम सुरू असलेल्या भामा-आसखेड योजनेचे काम पूर्ण होण्याआधीच भारतीय जनता पक्षाला या प्रकल्पाच्या उद्घाटनाची घाई झाली आहे. प्रकल्पाच्या पाहणीसाठी गेलेल्या भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. मात्र, या घोषणेला राष्ट्रवादी कॉंग्रसनेही प्रत्युत्तर दिले असून, “हे काम केवळ राष्ट्रवादीमुळे पूर्ण झाले असून भाजपचे शहराध्यक्ष या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत,’ अशी टीका वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली आहे.
जगदीश मुळीक यांनी शुक्रवारी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक योगेश मुळीक, अनिल टिंगरे, सुनिता गलांडे, संदीप जऱ्हाड, राहुल भंडारे, शितल शिंदे, ऐश्वर्या जाधव, मुक्ता जगताप, स्वीकृत नगरसेवक आशा जगताप, यांच्यासह,भामा-आसखेड प्रकल्पाला भेट देऊन पाहाणी केली.
मुळीक म्हणाले, “राजकीय अडथळे, पुनर्वसनाचा तिढा, न्यायालयातील दावे यामुळे या योजनेचे काम रेंगाळले. परंतु त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील लोकप्रतिनिधींमध्ये नसलेली एकवाक्यता आणि त्यांनी उभा केलेला शहरी-ग्रामीण वाद कारणीभूत आहे. मात्र, देवेंद्र डणवीस यांनी वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे प्रकल्पग्रस्तांचे समाधान करता आले. तसेच करंजविहिरे, आळंदी, कुरूळी, वाकी-वाडा या प्रकल्पांमुळे बाधित गावांमध्ये पुणे महापालिकेला विकासकामे करता आली. त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’
उद्घाटन अजितदादाच करतील
“मुळीक यांनी केलेली उद्घाटनाची घोषणा म्हणजे आपले अपयश झाकण्यासाठी केलेला केवलवाणा प्रयत्न आहे,’ अशी टीका आमदार सुनील टिंगरे यांनी केली आहे. या प्रकल्पास महापालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने मान्यता दिली. तसेच त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, प्रकल्प सुरू झाल्यानंतर एका वर्षातच केंद्रात व राज्यात सत्ताबदल होऊन भाजपचे सरकार आले. मात्र, या काळात भाजपने शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न भिजत ठेवला. तातडीनं निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे प्रकल्प रेंगाळला होता. मात्र, गेल्या वर्षभरात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुनर्वसनासह, अनेक प्रश्न मार्गी लावल्यानेच ही योजना पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या हस्तेच या योजनेचे लोकार्पण करण्याचा निर्णय महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकित घेण्यात आला आहे.’