पुणे(प्रतिनिधी) – न्यायालयात सुरू असलेला खटला रद्द करण्यासाठी बाजूने निकाल लावण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप असलेल्या महिला न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी फेटाळला. खासगी महिलेला खटला रद्द करण्यासाठी न्यायाधीश मॅनेज करून निकाल देण्याच्या नावाने अडीच लाखाची लाच मागून 50 हजार रुपये स्विकारताना लचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यामध्ये न्यायाधीशाचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना जतकर यांचा अटकपूर्व फेटाळण्यात आला आहे. प्रथमदर्शनी त्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्या खासगी महिला आणि जतकर यांच्या 147 फोनचे कॉल झाले आहेत. या प्रकरणाप्रमाणेच आणखी 7 ते 8 जणांशी त्या खासगी महिलेने संपर्क साधला आहे. त्या सर्वांची प्रकरणे जतकर यांच्याच न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यापैकी काहीशी एसीबी चौकशीसाठी संपर्क साधला आहे.
अधिक तपासासाठी त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचा युक्तीवाद सहायक जिल्हा सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी केला. खासगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय 29, रा. तळेगाव) हिला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तिला जामीन मिळविला आहे. 13 जानेवारी रोजी किवळे, ता. हवेली येथे ही घटना घडली. वडगाव मावळ तालुक्यातील इंदुरी येथील 32 वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी कडजई माता दुध संकलन मंडळाचे अध्यक्ष आहेत. दुध संकलन करून अमोल डेअरीला घालण्यात येत असत. फिर्यादी आणि भावाच्या विरोधात अमोल डेअरीने केस दाखल केली आहे. तुम्हाला आणि भावाला अटक होणार आहे. ही केस रद्द करण्यासाठी न्यायाधीश मॅनेज करण्याच्या नावावर शुभावरी हिने लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.