सोनिया आणि तिचा नवरा प्रकाश दोन्ही स्वत:हून भेटायला आले. आल्यावर प्रकाशने रितसर दोघांची ओळख करून दिली. प्रकाश एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तो बऱ्याच मोठ्या पदावर होता. सोनिया पूर्वी नोकरी करत होती. त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती. त्यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता. त्याला दत्तक घेतल्यानंतर, सोनियाने खूप ओढाताण होते म्हणून नोकरी सोडून दिली होती व ती पूर्णपणे त्या मुलाकडे लक्ष देत होती.
लग्नाला इतकी वर्षं झाली पण सोनिया आणि प्रकाश यांचे एकमेकांशी फारसे पटत नव्हते. दोघांची सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होतच होती. ही भांडणे नेहमीच टोकाला जायची. मग ते कित्येक दिवस एकमेकांशी बोलत नसतं. त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले नव्हते. दोघंही एकमेकांबाबत कोणत्याच बाबतीत समाधानी नव्हते.
प्रकाश हे बोलत असतानाच सोनिया एकदम चिडली व तिने मधूनच बोलायला सुरुवात केली. “हा सतत माझ्याशी खोटं बोलतो. उशिरा-उशिरापर्यंत बाहेर राहतो. घरी आल्यावर माझ्याशी धड दोन शब्द बोलत पण नाही. जेवतो आणि मुलाशेजारी जाऊन झोपतो. मी बोलायचा प्रयत्न केला तर धड बोलत नाही. याला त्याच्या आईवडिलांची फुस आहे. “मी मूल देऊ शकत नाही, म्हणून मला सोडून दे’, असे ते दोघे सतत प्रकाशला सांगत असतात. मी त्यांना नको आहे. कारण त्यांचे खुप चुकीचे वागणे मी प्रकाशसमोर आणले.
ते सतत याच्या मनात माझ्या बद्दल वाईट भरवतात. म्हणूनच त्यांना मी नकोय. मी त्याला याबाबत किती वेळा समजावलयं. हा तेवढ्यापुरता चांगला वागतो, की पुन्हा तेच. मी त्याला आईवडिलांशी संबंध तोडायला सांगितले तर हा त्यांना लपुनछपुन, खोटं बोलून भेटतो आणि पैसे देतो. आम्ही कसा संसार करायचा? मला कंटाळा आलाय सगळ्याचा.
मला हे नातं नकोय, याचा माझ्या मुलावर खुप वाईट परिणाम होतोय. ‘या तिच्या बोलण्यावर प्रकाशने फक्त सकारात्मक मान हलवली आणि तो गप्प बसला. सुरुवातीला ही केस अगदी साधी म्हणजे “विवाहानंतरचे समुपदेशन’ अशी वाटली. त्यानंतर त्यांची एकत्र-स्वतंत्र अशी पाच सहा सत्रे घेतली गेली. तेव्हा ही केस अधिक गुंतागुंतीची असल्याचे लक्षात आले.
एका स्वतंत्र सत्रात सोनियाने तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आणि तो सिद्ध करण्यासाठी तिने बरीच धडपड केली होती. जसे की, त्या मुलीला जाऊन भेटणे, तिला सारखे फोन करणे, नवऱ्याच्या सतत मागे लागणे इ.
प्रकाशचा मात्र याला ठाम विरोध होता. तो ही गोष्ट मान्य करण्यास तयारच नव्हता. केसची गुंतागुंत लक्षात घेता सोनियाची एक मानसशास्त्रीय चाचणी घेण्यात आली व तिचा राग, संताप नियंत्रणात ठेवण्यासाठी तिला काही औषधंही देण्यात आली. यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.
या चाचणीच्या निदानावरून असे लक्षात आले की, या सततच्या तणावामुळे सोनियाला एक मानसिक आजार जडला आहे. सुदैवाने त्याची तीव्रता अजून कमी होती. पण तिला केवळ समुपदेशन करून चालणार नाही. तर औषधोपचारांचीही तिला गरज आहे. त्यामुळे या दोन्हीच्या मदतीने तिच्या आजाराची तीव्रता कमी कमी करण्यात आली.
प्रकाशमध्येही काही समस्या असल्याचे त्याच्या चाचणीतून निदर्शनास आल्याने सोनियाच्या आई-वडिलांची या सर्व प्रक्रियेत मदत घेण्यात आली. सुरुवातीला त्यांचा या साऱ्यास विरोध होता. पण समुपदेशन सत्र घेतल्यानंतर त्यांनाही केसची गंभीरता लक्षात आली व त्यांनी सहकार्याची तयारी दाखवली. सोनियाचा मानसिक आजार 100 टक्के बरा होणारा नसला तरी औषधोपचार, समुपदेशन आणि घरच्यांचे सहकार्य यामुळे परिस्थिती बरीच नियंत्रणात आली.
अर्थातच प्रकाशमध्ये असणाऱ्या समस्यांसाठी त्यालाही औषधे देण्यात आली. ज्यामुळे त्यांचा संसार बऱ्याच प्रमाणात सुरळीत सुरु झाला. यात खरं तर घरच्यांचं सहकार्य खूप महत्वाचं होतं; आणि त्यांनी ते केलं.
– मानसी तांबे-चांदोरीकर