ग्रामीण भागातील लोकांकडून असहकार : नात्यातील लोकांकडून दुजाभाव
निवृत्तीनगर- करोना संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे शहर तसेच गावाकडे दुकाने, शाळा, खासगी कार्यालये बंद झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पुण्याहून ग्रामीण भागात मोठ्या संख्येने लोकांचे लोंढे येत आहेत. ग्रामीण भागातील लोकांनी धास्ती घेतली आहे. बाहेरून आलेल्या गावातील व नात्यातील लोकांबरोबर बोलणं भेटणे बंद केल्यामुळे रक्तीची नाती सुद्धा करोनामुळे गोठली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
भारतात करोनाची बाधा पोहोचली आहे. त्यामुळे शहरे आता ओस पडू लागली आहेत. पुणे शहरात रोजगारवाटा शोधण्यासाठी आलेले हजारो लोक पुण्यातच स्थायिक झाले आहेत. मात्र, कधीही गावाची ओढ नसलेली ही भौतिक सुविधांमागे धावणारी ह सिंस्कृत कुटुंबे आता आपल्या मूळगावी परतत आहेत. ग्रामीण भागांत अद्यापि करोनाची तपासणी करण्याची सोय नाही. केवळ प्रत्येक नगरपालिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. करोना जरी झाला तरी उपचार सुविधा व यंत्रणा ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही. पिंपरी – चिंचवडमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातुन मोठ्या प्रमाणात गावाकडे लोक येत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
करोनाच्या संदर्भातील गांभीर्य व रोग आपल्या गावात पोहचलाच नाही, हा फाजील आत्मविश्वास जीवघेणा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांनी या रोगाचा होणारा प्रादुर्भाव तितकासा मनावर घेतला नाही. हा आजार आपल्याला होऊच शकत नाही किंवा ‘छे …..अरे हा शहरी आजार आहे’ हे आपल्यापर्यंत येत नाही, अशा विचारांत राहिल्यास हा संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींनी सुद्धा आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. तर गाव सुरक्षित राहणार आहे.