औरंगाबाद – सध्याची करोनाची परिस्थिती ही किल्लारी भूकंपापेक्षा खूप वेगळी आहे. 1993मध्ये किल्लारीत झालेला भूकंप हा एका जिल्हयापूरता मर्यादित होता. परंतु करोनाची स्थिती ही राज्यासह देशावर ओढावलेले गंभीर संकट आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. या संकटाला सर्वांनी एकत्रितपणे सामोरे जाणे आवश्यक आहे. देशातील पाच-सहा राज्यांची स्थिती चिंताजनक असून यात महाराष्ट्राचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
औरंगाबादमधील करोनाच्या परिस्थितीची शरद पवार यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व अन्य अधिकारी उपस्थित होते. करोनाच्या संकटात खासगी रुग्णालयांना आणि डॉक्टरांना काम करावेच लागेल, असे म्हणत सहकार्य न करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा शरद पवार यांनी दिला.
शरद पवार म्हणाले, करोना संकटाला सगळ्यांनी मिळून सामोरे गेले पाहिजे. सगळ्यांनी एकत्र आले तर या संकटाचा सामना करण्यात यश येईल. देशातील 5-6 राज्यांची स्थिती काळजी करण्यासारखी आहे. यात महाराष्ट्रचाही समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, पिंपरी चिंचवड आणि औरंगाबाद ही शहरे चिंता करण्यासारखी आहेत. अनेक उत्सवात लोकांनी सहकार्य केले. त्यामुळे हा आजार पसरु शकला नाही. त्यामुळे ईद घरात साजरी करावी आणि नमाज सुद्धा घरात करावा आणि एक आदर्श घालून द्यावा,असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच करोनाच्या संकटात खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांनीही डॉक्टरांनी पूर्ण सहकार्य केले पाहिजे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडे मदत मागितली तर ती दिली पाहिजे. कोणी देत नसेल, तर हॉस्पिटल ताब्यात घेऊन समन्स देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. राज्यात सध्या बेड वाढवण्याची गरज आहे. ही एक कमतरता आहे. खासगी डॉक्टरांना या आजारात साथ द्यावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टीमकडून काम करुन घेत आहेत. सर्वांशी संवाद आणि समन्वय ठेवून मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावे लागतात. त्याप्रमाणे मुख्यमंत्री निर्णय घेत असून त्यांची कामगिरी चांगली आहे. करोनाच्या संकटावर, रुग्णसंख्येवर ते व्यवस्थित लक्ष ठेवून आहेत. ऑगस्ट महिन्यात करोनाचा रेट वाढू शकतो, असे तज्ज्ञांचं मत आहे. ही बाब लक्षात घेऊन हा करोना रुग्णांचा रेट वाढू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.