जयपूर -राजस्थान विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. राजकीय पेच मिटवण्यासाठी सत्तारूढ कॉंग्रेसचे आमदार गरज भासल्यास राष्ट्रपतींची भेट घेतील. प्रसंगी पंतप्रधान निवासस्थानालाही घेराव घालतील, असा इशारा आता त्यांनी दिला आहे.
तरूण नेते सचिन पायलट यांच्या बंडामुळे राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. पायलट आणि त्यांचे समर्थक असणाऱ्या कॉंग्रेसच्या 18 आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. ती कोंडी फोडण्यासाठी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची तयारी गेहलोत यांनी दाखवली आहे.
मात्र, राज्यपाल कलराज मिश्रा यांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय अजून घेतला नसल्याने गेहलोत यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यातून शुक्रवारी त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस आमदारांनी राजभवन परिसरात धरणे धरले. त्यानंतर शनिवारी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली.
सरकारच्या पाठिशी असणाऱ्या कॉंग्रेस आमदारांनी सध्या एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. तिथे झालेल्या बैठकीत बोलताना गेहलोत यांनी प्रसंगी राष्ट्रपतींना भेटण्याचे किंवा पंतप्रधान निवासस्थानासमोर धरणे धरण्याचे सूतोवाच केले. आमदारांना कदाचित अधिक काळ हॉटेलमध्येच रहावे लागेल, असे म्हणत त्यांनी पेच लवकर संपण्याची चिन्हे नसल्याचेही सूचित केले.
विधानसभेचे अधिवेशन न बोलावण्यासाठी राज्यपालांवर वरून दबाव असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. त्यातून राजस्थानमधील सत्तासंघर्षामागे केंद्र सरकारचे नेतृत्व करणारा भाजप असल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान, राजस्थान मंत्रिमंडळाकडून अधिवेशन बोलावण्याची विनंती करणारा नवा प्रस्ताव राज्यपालांना पाठवला जाणार असल्याचे समजते.