औरंगाबाद – राज्यासह औरंगाबाद शहरामध्ये काही दिवसांपासून करोनाची वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी आज सर्व हॉटेल, परमिटरूम, ढाबे इत्यादी ठिकाणी डायनींग सुविधा बंद करून फक्त डिलिव्हरी आणि पार्सल सुविधाच सुरू राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाची अंमलबजावणी दि. 17 मार्चपासून करण्यात येणार असून कठोर निर्बध सकाळी 6 वाजेपासून लागू होणार आहे.
11 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान औरंगाबादेत अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तर या काळात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये ग्राहकांना बसून जेवण करण्याची मुभा होती. मात्र आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बुधवारपासून हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा देण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पाच दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच हॉटेल, परमिटरुम, ढाबे, रिसॉर्ट अशा ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी करोनाला आमंत्रण देणारी आहे. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव अजून वाढण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. अशीच परिस्थिती पुढेही राहिली तर अजून कठोर निर्णय जिल्हा प्रशासन घेऊ शकते.
नागपूर लॉकडाऊन
नागपूर शहरात आजपासून म्हणजेच 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली. यावेळी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असेही त्यांनी सांगितले. 10 मार्चला नागपूरमध्ये 1700 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. यानंतर लॉकडॉऊनचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उद्योग सुरू राहणार असून खासगी कार्यालय मात्र बंदच राहणार आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 25% कमर्चारी उपस्थित राहू शकतात.