नवी दिल्ली -देशातील करोना लसीकरणाने शुक्रवारी महत्वपूर्ण टप्पा ओलांडला. त्यानुसार, देशातील नागरिकांना देण्यात आलेल्या लसींच्या डोसची संख्या 50 कोटींवर पोहचली.
देशात शुक्रवारी एका दिवसात 43.29 लाखांवरून अधिक डोस देण्यात आले. त्याची माहिती देऊन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी देशाने ऐतिहासिक विक्रम नोंदवल्याच्या आशयाचे ट्विट केले.
देशातील करोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 16 जानेवारीला झाला. तेव्हापासून 203 दिवसांत लसींचे 50 कोटींहून अधिक डोस देण्यात आले. पहिल्या 10 कोटी डोसचा टप्पा पार करण्यास देशाला 85 दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर पुढील 45 दिवसांत एकूण 20 कोटी डोस देण्यात आल्याची नोंद झाली.
आणखी 29 दिवसांनी 30 कोटी, तर पुढील 24 दिवसांनी 40 कोटींचा पल्ला गाठला. त्यानंतर 50 कोटी डोसपर्यंत पोहचण्यासाठी देशाला अवघे 20 दिवस पुरेसे ठरले. त्यातून देशातील लसीकरणाचा वेग वाढल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सूचित केले. जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम म्हणून भारतातील मोहिमेकडे पाहिले जात आहे.