मुंबई – महागाई वाढण्याची शक्यता असूनही रिझर्व्ह बॅंकेने पतधोरणात व्याजदर अगोदरच्या कमी पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्राकडून कर्जाचा वापर होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकत दास यांनी सांगितले की, महागाई सहा टक्क्यांच्या पुढे गेली आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये पतधोरण समितीने रेपो दर चार टक्के या पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर भांडवल सुलभता वाढविण्यासाठी रिझर्व बॅंक 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज रोखे खरेदी करणार आहे. यावर्षी विकास दर 9.5 टक्के या पातळीवर कायम राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केला आहे.
जीएसटी कर संकलनात झालेली वाढ, टोल संकलनात झालेली वाढ, मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्रात होत असलेली वाढ पाहता आगामी काळात अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येईल अशी आशा रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षात रिझर्व्ह बॅंकेने आपल्या व्याजदरात बरीच बराच कपात केली असून त्यामुळे रिऍल्टी, लघुउद्योग आणि मोठ्या उद्योगांना फायदा होत असल्याचे दास यांनी सांगितले.
करोना विषयक परिस्थितीकडे लक्ष
गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अर्थ मंत्रालयाबरोबर रिझर्व्ह बॅंकेनेही विविध क्षेत्रासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळे विविध क्षेत्र पूर्वपदावर येण्यास मदत होऊ लागली आहे. अजूनही देशातील लसीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बदलणाऱ्या परिस्थितीकडे बारीक लक्ष असून योग्य वेळी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे सांगण्यात आले.