मुंबई- करोना व्हायरसमुळे विविध कंपन्यांच्या आणि ग्राहकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात बॅंकांच्या 5.5 लाख कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीवर परिणाम होऊ शकतो.
या संदर्भात इंडिया रेटिंग अँड रिसर्च संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, कंपन्यांच्या कर्ज वसुलीवर 3.4 लाख कोटी तर इतर नागरिकांच्या कर्जवसुली वर 2.1 लाख कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीवर परिणाम होऊ शकतो. सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या कामकाजावर लॉक डाउनलोडचा परिणाम झाला आहे. अगोदरच बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता जास्त होती. त्यामुळे त्यासाठी बॅंकांना अधिक तरतूद करावी लागली होती.
त्यामुळे बॅंकांच्या नफ्यावर परिणाम झालेला आहे. आता या वर्षी आणखी बरीच अनुत्पादक मालमत्ता निर्माण होणार असल्यामुळे बॅंकांना त्यासाठी अधिक तरतूद करावी लागणार आहे. या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार 30 हजार कंपन्यांच्या कर्ज वसुलीवर परिणाम होऊ शकतो. केवळ कंपन्याच नाहीतर रिटेल, शेती आणि लघुउद्योगाच्या कर्जवसुलीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सरकारी बॅंकाबरोबरच खाजगी बॅंकांच्या अनुत्पादक मालमत्तेवर दबाव येऊ शकतो. अशा अवस्थेत सरकारला पुन्हा सरकारी बॅंकांना भांडवली मदत करावी लागेल. यासाठी सरकारला 30 ते 55 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल.