नवी दिल्ली – सध्या दिल्लीतील त्यांच्या रुग्णालयातील गर्दीत आपत्कालीन कक्षात अली रझा हे पुढील ऑक्सिजन कधी येणार याच्याकडे फार लक्ष देऊच शकत नाहीत… त्यांच्याकडील 20 डॉक्टरांपैकी 12 जण करोनाने बाधित झाले आहेत. मात्र अशाही स्थितीत त्यांच्याकडे बाधितांचा ओघ कायम आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात करोनाच्या साथीचा दुसरी लाट येईल, याची आम्हाला कल्पना होती. मात्र, ती एवढ्या वेगाने आणि तीव्रतेने आघात करेल, याची कल्पना नव्हती, असे मूलचंद रूग्णालयाचे आपत्कालीन संचालक रझा यांनी सांगितले.
या वॉर्डच्या दरवाजाबाहेर गणदीप त्रेहान उभे होते. श्वासासाठी धडपडणाऱ्या त्यांच्या काकांसाठी कोणताही बेड अथवा ऑक्सिजन शिल्लक नाही, असे तेथे त्यांना सांगण्यात आले. त्रेहान हे पंजाबमधून 310 किमी मोटार चालवत बेडच्या शोधात दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांची मोटार चार ऑक्सिजन सिलिंडरनी भरून गेली आहे. मात्र काकांना जीवंत ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. सहा रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. आता सातव्या रुग्णालयात जाण्यासाठी ते पार्किंगच्या दिशेने जाऊ लागतात.
त्यांना उपचार मिळाले नाहीत तर ते मरून जातील, अशी भीती वाटते. त्यामुळे बेडसाठी लागतील तेवढे पैसे भरण्याची माझी तयारी आहे, असे डोळ्यात पाणी आणून त्रेहान सांगत असतात. एका रुग्णालयाच्या आतील ही परिस्थिती जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या या साथीमुळे देशात असणाऱ्या असहाय्य परिस्थितीवर प्रकाशझोत टाकत असते. एक कोटी 60 लाखांच्या या राजधानीत मंगळवारी सकाळी केवळ 12 अतिदक्षता बेडस उपलब्ध होते. समाजमाध्यमांत बेडच्या चौकशी करणाऱ्या न संपणाऱ्या चौकशींच्या पोस्ट धडाधड येत आहेत.
धोक्याची घंटा
राजधानी खासगी करोना रुग्णालयात सर्वात मोठे असणाऱ्या मुलचंद रुग्णालयात आठवड्याच्या अखेरीस आणीबाणीची स्थिती आली होती. या रुग्णालयाने ऑक्सिजनची याचना करण्यासाठी अखेरचा उपाय म्हणून ट्विटरचा आधार घेतला. त्यात ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग केले. त्यावेळी दोन तासांपेक्षा कमी काळ पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक होता.
ऑक्सिजनची पातळी खालावल्याचे सहकाऱ्यांनी लक्षात आणून देताच मूलचंद हेल्थकेअर समुहाचे व्यवस्थापकीय संचालक विभु तलवार यांना रात्री दोन वाजता धोक्याची घंटा वाजवली. “”सकाळी सात वाजण्याच्या सुमारास केवळ एक तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक राहिला होता. त्यामुळे मी आणीबाणीचा इशारा देणारे बटन दाबले. आमचे व्यवस्थापनातील सहकारी, डॉक्टर्स आणि परिचारिकांवर प्रचंड ताण होता. आम्ही 150 रुग्णांच्या निकट उभे होतो. वातावरणात प्रचंड घबराट होती. आशा करतो, अशी वेळ पुन्हा काधी न येवो, अशी भावना तलवार यांनी व्यक्त केली.
पण प्रत्येक दिवशी हीच स्थिती आहे. राजधानीतील कोणत्याही रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठ्याची कोणतीही हमी नाही. आम्हाला कधी आणि किती ऑक्सिजन मिळेल, याची काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींवर टीकेची झोड
देशाची राजकीय आणि आर्थिक राजधानी असणारी दिल्ली आणि मुंबई या शहरात लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे ही साथ हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल मोदी यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. आरोग्य क्षेत्रावरील तणाव वाढत असतान त्याकडे लक्ष देण्याऐवजी ते प्रचारात व्यस्त होत होते, अशी टीका सर्वत्र केली जात आहे.
जेंव्हा कमी बाधितसंख्या होती असा सहा महिन्यांचा काळ आपल्याकडे होता. त्या काळात सरकारने अधिक रुग्णालये आणि पायाभुत सुविधा निर्माण करायला हव्या होत्या. ते जाऊ द्या सध्याच्या काळात किमान ऑक्सिजन पुरवठा सुरळीत तरी करायला हवा आम्ही सरकारकडून किमान एवढीच अपेक्षा आहे, रझा सांगत होते.