गोवाहाटी – ईशान्य भारतातील बहुतेक भागाला आज सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. प्रामुख्याने आसाममध्ये या भूकंपाची तीव्रता सर्वाधिक होती. भूकंपाची तीव्रता तेजपूरमध्ये 6.4 रिश्टर इतकी होती. भूकंपाचा पहिला धक्का सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी बसला आणि त्याचा केंद्रबिंदू सोनितपूर जिल्ह्यात होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भूकंपामुळे इमारतींना तडे गेले आणि भयभीत झालेल्या नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.
या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र काही किरकोळ पडझडीच्या घटनांमध्ये तिघेजण जखमी झाले. पहिल्या धक्क्यानंतर थोड्या वेळाने भूकंपाचे आणखी काही धक्के दीर्घकाळ जाणवत राहिले होते. मात्र त्याची तीव्रता हळूहळू कमी होत गेली. सकाळी 8 वाजून 44 मिनिटांपर्यंत हे आफ्तरशॉक जाणवत राहिले होते असे प्रादेशिक भूगर्भशास्त्र केंद्राचे उपसंचालक संजय ओनिल शॉ यांनी सांगितले.
सकाळी 10.05 वाजता आसामच्या नागाव जिल्ह्यात 2.2 तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. थोड्या वेळाने सकाळी 10.39 वाजता तेजपूरला 4.4 तीव्रतेचा आणखी एक धक्का बसला. तर 12 वाजून 32 वाजता मारीगाव येथे भूकंपाचा आठवा धक्का बसला आणि त्याची तीव्रता 2.9 इतकी होती.
संपूर्ण आसाममध्ये मुख्यत: तेजपूर, नागाव, गुवाहाटी, मंगलदोई, ढेकियाजुली आणि मोरीगाव या मध्य आणि पश्चिम शहरांमध्ये इमारती व इतर मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे, या भागातील अनेक रस्त्यांवर मोठ्या भेगा पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. याशिवाय अनेक भागात शेतात पाणी साचल्यामुळे शेतीची कामे विस्कळीत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व आवश्यक ते सहकार्य देण्याची तयारी दर्शवली आहे.